स्वतःवर विश्वासुन स्वतःशीच स्पर्धा असू द्या – वर्षा गाळवणकर

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कुल मध्ये दीक्षांत समारंभ
आपणास आणि आपल्या पाल्यांची प्रगती करायची असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्पर्धा स्वतःशीच असू द्या. जेणेकरून आपण आपल्यातील उत्तमोत्तम सादर करू शकू, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या वर्षा गाळवणकर यांनी केले. बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ मधील युकेजी विद्यार्थ्यांच्या दीक्षांत समारंभात अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या.
लहान मुलांच्या शैक्षणिक प्रवासातील एक खास आणि आनंददायी क्षण म्हणजे युकेजी (upper kindergarten). विद्यार्थ्यांचा हा दीक्षांत (convocation) समारंभ असतो. मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अनिता नाडकर्णी,भूषण नाडकर्णी, उमेश गाळवणकर चैताली बांदेकर,अमृता गाळवणकर, कल्पना भंडारी परेश धावडे,चित्रा कुंटे, प्रीती म्हाडदळकर, इत्यादी उपस्थित होते. पारंपारिक पद्धतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
वर्षा गळवणकर पुढे म्हणाल्या, सीबीएसई सेंट्रल स्कूलच्या मुलांचा हा दीक्षान्त समारंभ म्हणजे जूनियर के जी, सीनियर केजी ही एका खेळकर बाल्यावस्थेतील वर्ष टाकून शिक्षण व्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थाने प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभच असतो. बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल ही या ज़िल्हयातील एक सर्वोत्तम शाळा आहे. सर्व सोयीने युक्त असलेली ही शाळा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असलेल्या अनेक सदगुणांना व्यासपीठ मिळवून देणारी, त्यांना उर्जितावस्थेमध्ये आणणारी शाळा आहे. मुंबईतील अनेक शाळांमध्ये जे उत्तम आणि पद्धतशीर शिक्षण मिळाले पाहिजे ते या शाळेत मिळत आहे. या शाळेच्या नावात इंटरनॅशनल शब्द नसला तरी शाळेचा दर्जा व कार्य इंटरनॅशनल दर्जाच आहे. आणि पालकांसाठी आणि सिंधुदुर्गासाठी ही गौरवाची बाब आहे की येथील मुलं आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचत आहेत. या शाळेतील विद्यार्थी हे आपल्या संस्कृतीची पूजा आणि महती सांगणाऱ्या प्रार्थना म्हणत असतात, जेणेकरून त्यांच्यावर चांगले भारतीय संस्कार होऊ शकतात, ही समाधानाची बाब आहे. आजच्या पिढीची ती गरज आहे. ही गरज या शाळेतील शिक्षक व संस्थाचालक योग्य पद्धतीने पूर्ण करत आहेत. यासाठी या सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पालकांनी सुद्धा शाळेच्या बरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना जोपासून, त्यांना योग्य मार्गदर्शन करून मोबाईल पासून दूर ठेवून, थोर महात्म्यांचे आदर्श समोर ठेवून त्यांच्या गोष्टी त्यांना कथन करून त्यांना त्यांच्यातील गुणांची ओळख करून देण्याच्या गरजेचे प्रतिपादन केले. लहान मुलांना सांभाळताना पालकांची जबाबदारी याचे मार्गदर्शन करून शाळेच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणाऱ्या सौ.अनिता नाडकर्णी यांनी आनंददायी शिक्षण कसे असावे ते बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल या सीबीएसई बोर्डाच्या शाळेत बघायला मिळाले. या शाळेत शिक्षणाबरोबर जगण्याचे सामर्थ्य मुलांच्या मनामध्ये निर्माण केले जाते. हे फार मोठी उपलब्धी आहे. याची तुलना पैशात करता येणार नाही. यासाठी पालकवर्गांनी शिक्षकांचे, संस्थेचे आभारच मानले पाहिजे.असे म्हणत शाळेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांनी मुलांच्या या दीक्षांत समारंभामध्ये उपस्थित राहिल्याबद्दल वर्षा गाळवणकर, अनिता नाडकर्णी, भूषण नाडकर्णी यांचे आभार व्यक्त करून या मुलांच्या स्वागतासाठी आणि त्यांना पुढील वर्गामध्ये प्रवेश करण्यासाठी आयोजित केलेल्या दिमाखदार कार्यक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
पालकांच्या वतीने बोलताना गिरी गोसावी, यानी शाळेमध्ये मुलांना व्यक्तिमत्व विकासासाठी स्टेज डेरिंग देण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच सौ.खाडे यांनी आम्हा पालकांपेक्षा इथले शिक्षक मुलांची ज्या आस्थेने, तळमळीने, जिव्हाळ्याने, प्रेमाने काळजी घेतात याबद्दल सगळ्यांचे कौतुक व्यक्त करून आभार मानले.
या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सदर करीत व नृत्यरुपी आभार मानून कार्यक्रमांमध्ये अधिकच रंगत आणली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य चैताली बांदेकर यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी परब यांनी केले.





