वायंगणीतील महिला शिक्षिकेच्या संशयास्पद मृत्यूचे सत्य समोर आणा

ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे निवेदन

मालवण तालुक्यातील वायंगणी येथील 28 वर्षीय महिला विवाहित शिक्षिका अंतरा हर्षद दुखंडे यांच्या संशयास्पद मृत्यू होऊन एक महिन्याच्या कालावधी लोटूनही मृत्यू मागचे सत्य समोर न आल्याने वा्यंगणी गावातील महिलांनी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांची भेट घेत याप्रकरणी सखोल व वेळबद्ध चौकशी करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. यावेळी या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे असल्याचे महिलांनी निवेदनाद्वारे सांगत लक्ष वेधले आहे
यावेळी वायंगणी सरपंच रुपेश पाटकर, उपसरपंच ऍड समृद्धी आसोलकर, सदस्य सचिन रेडकर, संजना रेडकर, मंजिरी राणे, रावजी सावंत, महादेव खोत तसेच अन्य महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित शिक्षिका या अत्यंत कर्तव्यदक्ष व विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होत्या. त्या इयत्ता 1 ली ते 10 वीपर्यंत अध्यापन करत होत्या तसेच गावातील अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन देत होत्या. त्यांच्या आकस्मिक व संशयास्पद मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. तपासाबाबत निवेदनात गंभीर बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. घटनेनंतर सुरुवातीच्या 4 ते 5 दिवसांत तपास सक्रिय होता. यामध्ये डॉग स्क्वॉड तपास, फॉरेन्सिक तपास तसेच सीआयडी अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट घेऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती. मात्र त्यानंतर तपासाची गती मंदावल्याचे दिसून येत असून आजपर्यंत मृत्यू आत्महत्या की हत्या याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही या घटनेमुळे गावातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका महिला शिक्षिकेच्या संशयास्पद मृत्यूचे सत्य समोर न आल्यास ग्रामीण भागातील महिला सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित शिक्षिकेच्या पश्चात लहान मुल असून त्यांच्या भविष्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 14 (समानतेचा अधिकार) व अनुच्छेद 21 (जीवनाचा अधिकार) यांचा उल्लेख करत, या प्रकरणात निष्पक्ष व पारदर्शक तपास व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणत वेळबद्ध तपास करण्याचे आदेश द्यावेत, तपासाचा Action Taken Report सादर करावा, तपासावर सतत निगराणी ठेवावी, या प्रकरणाला महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न म्हणून नोंद घ्यावी, मानवाधिकारांच्या दृष्टीने न्याय मिळवून द्यावा दरम्यान अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या असून प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून सत्य समोर आणावे व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी केली आहे. यावेळी पोलीस अधीक्षक यांनी 15 दिवसात निर्णया पर्यंत पोचू असे आश्वस्थ केले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

error: Content is protected !!