मालडी गावात हरिनामाचा जयघोष – भक्तिभावाने दुमदुमला हरिनाम सप्ताह

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पादस्पर्शाने धन्य झालेल्या मालडी गावात हरिनाम सप्ताह शनिवारी आणि रविवारी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. गावाच्या धार्मिक-सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेला हा सोहळा यंदाही भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे दिमाखात पार पडला.

१५ नोव्हेंबरच्या सकाळी १० वाजता देवीची पूजा, अभिषेक, तसेच देवीला मुकुट, साडी व दागिने परिधान करण्यात आले. मंत्रोच्चारांच्या गजरात भटजींनी सप्ताहाचे औपचारिक उद्घाटन केले. त्यानंतर सुहासिनी देवीची खण नारळाने ओटी भरून प्रारंभिक विधी संपन्न झाला. रात्री १२ वाजताची दिंडी हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षणाचा भाग ठरला. दिंडीसोबत झालेली रंगीत आतषबाजी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

यंदाच्या सप्ताहात १९ गावांतील भजन मंडळांनी सहभाग घेतला. त्यांच्या भावपूर्ण भजनांनी संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला. १६ नोव्हेंबरला सकाळी काकड आरती व उत्तरपूजा पार पडल्यानंतर महाप्रसाद वितरणाने या भक्तीमय सोहळ्याची सांगता झाली.

गावातील तसेच मुंबईतील मालडी ग्रामस्थ—लहानांपासून मोठ्यांपर्यंत—सर्वांनी श्रद्धा, प्रेम आणि भक्तीभावाने कार्यक्रमात सहभाग नोंदवला. संत परंपरेचा गौरव, हरिनामाची अखंड परंपरा आणि एकोप्याचा संदेश या सोहळ्यातून अधोरेखित झाला.

error: Content is protected !!