युती होणार असेल तर मिठाचा खडा पडू देणार नाही – उदय सामंत

युती नाही झाल्यास स्वतंत्र लढून भगवा फडकवू
कुडाळ : महायुती झाली पाहिजे या माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. युती होणार असेल तर मिठाचा खडा पडू देणार नाही. तरीही युती झाली नाही तर शिंदे सेना म्हणून आम्ही स्वतंत्र, लढून या जिल्ह्यात भगवा फडकवू, असे मत राज्याचे उद्योग मंत्री तथा शिंदे शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख उदय सामंत यांनी वक्त केले. कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी होत असलेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुती बाबत खासदार नारायण राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत युती झाली पाहिजे अस सुतोवाच केले. त्या बाबत सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले शिंदे सेनेचे संपर्कप्रमुख उदय सामंत यांनी कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली. उदय सामंत म्हणाले, माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राजकारणात खुप अनुभव आहे, राणे यांना विचारून पाऊल टाका असे नेते व उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हांला सांगितले आहे. त्यामुळे ते जे काही बोलतात त्याला खुप महत्व आहे. राणे यांनी महायुतीने पुढे गेले पाहिजे असे सांगितले आहे. युती व्हावी ही राणे यांची भूमिका आहे. आमची ही समन्वयातून युती व्हावी अशी भूमिका आहे. पण जर तसे घडले नाही तर तर मग आम्ही शिवसेना म्हणून लढणार. युती होणार असेल तर मिठाचा खडा पडू देणार नाही, असे सर्वांनी करावे असे आवाहन सामंत यांनी केले.
कणकवली नगरपंचायतीमध्ये शिंदे शिवसेना, उद्धव सेना व शहर विकास आघाडी बरोबर एकत्र होत निवडणुकीत उतरणार अशा बातम्या प्रसारित होत आहेत मात्र या बातमीमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसून शिंदेचे सेना कधीही उद्धव सेनेबरोबर युती करणार नाही, असे त्यांनी जाहीर केले रत्नागिरी जिल्ह्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सोबत बैठक झाली व महायुती झाली आहे असे श्री. सामंत म्हणाले.
माजी आमदार राजन तेली यांच्या बाबत राणे यांनी केलेल्या विधाना बाबत प्रतिक्रिया देताना सामंत यांनी सांगितले की, माजी आमदार राजन तेली हे महायुती मध्ये कुठेही अडसर ठरणार नाहीत. ठाकरे सेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आता कोण कार्यकर्ते राहिले नाहीत, त्यामुळे ते आता मतदार यादी तपासत बसले आहेत, अगोदर कधी मतदार यादी त्यांनी तपासली नव्हती. त्यामुळे त्यांना हे एक नवलच वाटत आहे. ते जे वोटबंदी करायला सांगत आहेत त्यांचे कोणीही ऐकणार नाही असा टोला त्यांनी ठाकरे यांना लगावला.





