कणकवली तालुका काँग्रेसकडून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत हल्लेखोराचा केला धिक्कार
तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना दिले निवेदन
भारत हे लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. या देशाचे संविधान देशातील नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधूता या तत्वांची शिकवण देते. गेली ७७ वर्षे संविधानाच्या भक्कम आधारावर भारत देश सक्षमपणे उभा आहे. सर्वोच्च न्यायालयाला लोकशाहीतील सर्वोच्च संस्था म्हणून लोकशाहीच्या अस्तित्वातील चार स्तंभामधे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश या देशाचे सर्वोच्च आदराचे व्यक्तिमत्त्व आहे. असे असताना काल एका मनूवादी धर्मांधाने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय भूषण गवई यांच्यावर बूट फेकून मारला ही या देशाच्या लोकशाही व्यवस्थेत घडलेली अत्यंत लांचनास्पद अशी घटना आहे.
या घटनेतून काही तथाकथित सनातनी घटकांची असहिष्णु आणि नीच प्रवृत्ती उघड झाली आहे, जी अविचारांच्या टोकावर उभी राहून लोकशाही संवादाच्या मुळावरच घाव घालते. मतभेद मांडण्यासाठी घटनात्मक आणि सभ्य मार्ग उपलब्ध असताना अशा हिंसक कृतींचा अवलंब करणे हे केवळ कायद्याचा अपमान नाही, तर भारतीय संस्कृतीतील संयम, संवाद आणि आदर यांच्या परंपरेचा अपमान आहे. म्हणूनच, या कृतीचा तीव्र निषेध करताना सरकारने आणि कायदा रक्षक संस्थांनी दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा प्रकारचे कृत्य पुन्हा होऊ नये यासाठी ठोस पावले उचलणे अत्यावश्यक आहे. आणि ही घटना म्हणजे तात्कालिक प्रतिक्रिया नसून एका फार मोठ्या सुनियोजित कटाचा भाग आहे. राज्यकर्ते पाठशी असल्याशिवाय एखादी व्यक्ती एवढी बेदरकारपणा दाखवू शकत नाही. कायद्याचा हा सर्वोच्च अपमान भविष्यात लोकशाहीत अराजक निर्माण करण्यासाठी आणि त्याचे समर्थक निर्माण करण्याची पूर्व तयारी आहे. म्हणूनच पोलिसांनी व राज्यकर्त्यांनी त्या इसमावर अजूनही कारवाई केलेली नाही. काय तर म्हणे न्यायालयाने तक्रार केली नाही. न्यायव्यवस्थेचा सन्मान आणि संविधानाचा गौरव टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, आणि त्यासाठी आपण सर्वांनी विवेक, संयम आणि सन्मान यांच्या मार्गावर राहणे हेच लोकशाहीचे खरे रक्षण ठरते.
या घटनेचा आम्ही राष्ट्रीय काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातर्फे जाहीर निषेध करत आहोत. सदर इसमास अटक होऊन योग्य ती कडक शिक्षा व्हावी अशी आम्ही आग्रही मागणी करत आहोत. अशी मागणी कणकवली तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी प्रदीप मांजरेकर तालुकाध्यक्ष कणकवली ,जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोरये,अनिल डेगवेकर,प्रविण वरुणकर,बाळू मेस्त्री,शहर अध्यक्ष अजय मोरये,निलेश मालंडकर,संतोष टक्के,प्रदीपकुमार जाधव,ऊन्मेष राणे,विजय सावंत,राजेंद्र कदम,श्री भोसले,राजू वर्णे आदी उपस्थित होते.यानंतर डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला .व वरील घटनेचा निषेध करण्यात आला.





