दर्जेदार साहित्य वापरा व सिंधुदुर्गातील वीज पुरवठा सुरळीत ठेवा: मंत्री नितेश राणे

धोकादायक पोल बदला, लाईनमन सतर्क ठेवा!
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वारा पाऊस जास्त असतो त्यामुळे जे साहित्य वापरण्यात येते ते चांगल्या दर्जाचे हवे. सुरळीत वीज पुरवठा हवा. कोणतीही तक्रार नको. सुरू असलेला पावसाळा व लगेच येणारा गणेशोत्सव यादृष्टीने योग्य नियोजन करा. प्रत्येक गावासाठी एक लाईनमन राहील हा प्रयत्न करा व नागरिकांचा विद्युत पुरवठा ठेवा, असे आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी आढावा बैठकीत दिले.
जिल्ह्यातील सुरळीत वीज पुरवठ्यासाठी पालक मंत्री नितेश राणे यांनी ही आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अप्पर पोलिस अधीक्षक नयोनी साटम, अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख, कार्यकारी अभियंता अरविंद म्हनमोरे, सौरभ माळी, मनीष दळवी, अशोक सावंत, तालुक्यांचे सर्व वीज अभियंता उपस्थित होते. जिल्ह्यात सर्व तालुक्यात १६०० पोल बदलणे आवश्यक आहेत. पोल उपलब्ध आहेत. दोडामार्ग तालुक्यात लोखंडी पोल हवे आहेत. दुर्गम भाग असलेल्या ठिकाणी सिमेंट पोल द्या व ही कामे तातडीने पूर्ण करा असे आदेश मंत्री नितेश राणे यांनी दिले.
मुंबईकर चाकरमानी येतील आता. गणेशोत्सव तोंडावर आलाय त्यादृष्टीने वीज वाहिन्या सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन करा. चांगली सेवा देणाऱ्या वायरमनचा सत्कार करा. विद्युत कामे करणाऱ्या एजन्सी कडून कामे जलद करून घ्या. त्यांना हेड क्वार्टरला थांबवा. त्याची बैठक घ्या असे आदेश ही मंत्री नितेश राणे यांनी दिले.