शास्त्रज्ञ पोहोचले थेट शेतीच्या बांधावर

विकसित कृषी संकल्प अभियानाचे आयोजन
किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचा स्तुत्य उपक्रम
🌺शास्त्रज्ञ व अधिकारी यांच्यामार्फत कृषी तंत्रज्ञानाचा जागर
🌺शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे मार्गदर्शन
दिवसेंदिवस शेतीच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे. त्यामानाने शेतकऱ्यांना उत्पादित मालाला भाव मिळत नाही. तसेच बदलत्या हवामानामुळे शेती उत्पादकतेवर मोठा परिणाम होत आहे. यावर्षी अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांची दानादान झाली असून बरीच पिके खराब होऊन शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. म्हणून शेतीचा उत्पादन खर्च कमी करून शास्वत नैसर्गिक शेती करावी असे मार्गदर्शन १५ दिवशीय विकसित कृषी संकल्प अभियानात शेतकऱ्यांना करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 90 गावांमध्ये या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. उत्तर सिंधुदुर्ग आणि दक्षिण सिंधुदुर्ग साठी दोन टीम द्वारे कृषी विभाग आत्मा ग्रामपंचायत व शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने किर्लोस कृषी विज्ञान केंद्रामार्फत हे अभियान राबविण्यात आले. शास्त्रज्ञ व अधिकारी यांनी थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन केले. अभियानामध्ये प्राधान्यक्रमाने नैसर्गिक शेती, हवामान बदलावर आधारित कृषि तंत्रज्ञान, पिकांचे सुधारित वाण, फळ प्रक्रिया, कुक्कुटपालन, बीज प्रक्रिया पिकांच्या लागवड पद्धती, एकात्मिक रोग व दूध व्यवस्थापन, गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन, कृषी विषयक विविध योजना इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास व मनोबल वाढवण्यात आले. कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख बाळकृष्ण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भास्कर काजरेकर, डॉ विलास सावंत, विकास धामापूरकर, सुयश राणे, डॉ केशव देसाई, विवेक सावंतभोसले, अधिकारी मंगेश पालव, नरेंद्र पालव, सिद्धेश गावकर, झीलू घाडीगावकर, मिलिंद घाडीगावकर यांनी सहभाग घेतला. तसेच कृषी विभाग, आत्मा व ग्रामपंचायतीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था मुंबईचे मत्स्य शास्त्रज्ञ डॉ. मनोज ब्राह्मणे डॉ. किरण रसाळ यांनी सहभाग घेऊन मार्गदर्शन केले. संपूर्ण जिल्ह्यात वीस हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या अभियानात सहभाग नोंदवला.