कवी डॉ.प्रफुल्ल आंबेरकर लिखित सूर्यभान काव्यसंग्रहात समाजाला भान देणारी कविता

प्रभा प्रकाशन प्रकाशित सूर्यभान काव्यसंग्रहाचे ॲड.देवदत्त परुळेकर यांच्या हस्ते प्रकाशन

जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती

   कवी डॉ.प्रफुल्ल आंबेरकर लिखित सूर्यभान काव्यसंग्रहात समाजाला भान देणारे कविता लेखन आहे.सदर कविता एकाबाजूला समाजाच्या दुःखाची मांडणी करते तर दुसऱ्या बाजूला भवताली सुखसमृद्धी नांदो अशी ज्ञानेश्वरांच्या विश्वप्रार्थनेची आठवण करून देते. त्यामुळे कवी डॉ प्रफुल आंबेरकर यांच्या कवितेचा भविष्यकाळ उज्वल आहे असे प्रतिपादन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक ॲड.देवदत्त परुळेकर यांनी केले. 

कणकवली शहरातील नामवंत त्वचारोग तज्ञ कवी डॉ प्रफुल आंबेरकर यांच्या प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या सूर्यभान काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा कसाल कोलते हॉस्पिटलच्या सभागृहात ॲड. देवदत्त परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. कवी लेखक ॲड. भालचंद्र सुपेकर यांनी उद्घघाटन केलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठी साहित्याच्या अभ्यासक प्रा. संजीवनी पाटील, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य मिलिंद कुलकर्णी, प्रसाद घाणेकर यांना निमंत्रित करण्यात आले होते.तर या प्रकाशन सोहळ्याला प्रभा प्रकाशनाचे संचालक कवी अजय कांडर, कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर, वर्षा आंबेरकर, कवयित्री डॉ . दर्शना कोलते, डॉ.प्रशांत कोलते यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
प्रा.संजीवनी पाटील म्हणाल्या, ‘सूर्यभान’ हा डॉ.आंबेरकर यांचा काव्यसंग्रह शीर्षकाने तर लक्षवेधी ठरतोच पण सोबतच आतील आशयाच्या अनुषंगाने वर्तमानातील परिघाला अनेक अर्थाने स्पर्श करतो. पुराणातील काही संदर्भ घेत-घेत जेव्हा यातील आशय वर्तमानाशी समांतर होतो, तेव्हा तो अधिक ठळक होत जातो. प्रकाशाची आस धरणारी ही कविता भविष्यात नक्कीच अधिक यशस्वी ठरेल हे नक्कीच.डॉ .कुलकर्णी म्हणाले, कवी आंबेरकर यांची कविता एका विशिष्ट विचारात अडकत नाही. त्यामुळे ती स्वतंत्रपणे विचार मांडते. उजवे डावे असा विचार न करता मध्यम मार्ग शोधणे ही आताच्या काळाची खरी गरज आहे आणि हाच विचार या कवितेतून आपल्याला सापडत जातो.त्यामुळे सर्व प्रकारचा वाचक या कवितेला लाभेल असा मला विश्वास वाटतो. प्रसाद घाणेकर म्हणाले चांगल्या कवितेपर्यंत पोहोचणे ही कष्टप्रत गोष्ट असते. त्या वाटेवरून नव्या कवींनी चालायला हवे. ॲड. भालचंद्र सुपेकर म्हणाले, सूर्यभान मधली कविता सामाजिक आशय मांडते. तिला कुठलाच विषय वर्ज नाही. आजच्या काळातील अनेक प्रश्न या कवितेत मांडले गेल्यामुळे अतिशय तीव्रपणे आपली भावना कवी डॉ आंबेरकर यांनी या कवितेतून व्यक्त केली आहे.डॉ. आंबेरकर म्हणाले सूर्यभान हा माझा दुसरा काव्यसंग्रह. या आजवरच्या कवितेच्या वाटचालीत जे कवितेचे चिंतन झाले आणि अनेक लोकांबरोबर झालेल्या चर्चेतून एक नवे भान आले त्यातून पुढचं कविता लेखन माझं होत राहील. आपण सतत जसजसे लेखन पुढे करत जातो त्यातून चांगल्या कवितेचा शोध घेतला जातो. सूर्यभान मध्ये अशा स्वतंत्र चिंतनाची कविता आहे. ही कविता माझ्या कवितेच्या रसिकांना नक्की आवडेल असा विश्वास वाटतो. यावेळी डॉ. संजय सावंत, डॉ. संदीप नाटेकर, डॉ गौरी गणपते, संतोष कदम आदींनी विचार व्यक्त केले.
राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. वर्षा आंबेरकर यांनी स्वागत केले.कवी अजय कांडर यांनी प्रास्ताविक तर डॉ. दर्शना कोलते यांनी आभार मानले.

error: Content is protected !!