सावडाव मारहाण व विनयभंग प्रकरणी तिघांना सशर्त जामीन मंजूर

संशयित आरोपींच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद

सावडाव येथे प्रमोद नरसाळे यांच्या जमिनीत जेसीबी लावून चर मारत असल्यावरून झालेल्या वादातून फिर्यादी, तीचे पती व मुलाला मारहाण तसेच विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या गणेश काटे, संतोष साळुंखे व व्यंकटेश वारंग यांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला आहे. आरोपींच्यावतीने अँड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

दि. १३ एप्रिल २०२५ रोजी सांयाकळी ७.३० वा.च्या सुमारास प्रमोद नरसाळे यांचे जमिनीत जेसीबी लावून चर मारण्याचे काम संपल्यानंतर नरसाळेसहीत फिर्यादी, त्यांचे पती व मुलगा घरी जात होते. यावेळी उपसरपंच दत्ताराम काटे तेथे आले व रस्त्यात आडवा का येतो, अशी विचारणा करत नरसाळे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी फिर्यादी, तीचे पती व मुलगा त्यांना सोडविण्यासाठी आले असता संदीप काटे, गणेश काटे, संतोष साळुंखे, व्यंकटेश वारंग तेथे आले. या सर्वांनी फिर्यादीसह पति व मुलाला मारहाण करून विनयभंग केला. तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १८९ (२), १८९ (४), १९०, १९१ (३), ७४, ७५, ११८ (१), ११५ (२), ३५२ (३), ३०३ (२), ३२४ (२) अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर २५ एप्रिल रोजी तीनही आरोपी पोलीसांत हजर झाले होते. त्यांच्या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर ते न्यायालयीन कोठडीत होते.

याप्रकरणी दाखल जामिन अर्जावर सुनावणी होत न्यायालयाने प्रत्येकी ५० हजार रुपयांचा जामिन मंजुर करताना साक्षी, पुराव्यात ढवळाढवळ करू नये, फिर्यादी व साक्षीदार यांच्याशी संपर्क साधू नये, सरकारी पुराव्यात ढवळाढवळ नको तसेच भारत सोडून जाऊ नये, अशा अटी घातल्या आहेत.

error: Content is protected !!