विवाहितेचा विनयभंग करून खंडणी उकळल्या प्रकरणी आरोपीला जामीन

संशयित आरोपीच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद

तालुक्यातील एका गावातील विवाहिता आंघोळ करीत असताना गुपचूपपणे तिचा व्हीडिओ काढत तो ‘व्हायरल’ करण्याची धमकी देऊन तिच्याकडून तब्बल २ लाख ७० हजार रुपये उकळल्याप्रकरणी विनयभंग व खंडणीचा गुन्ह्यात अटकेत असलेल्या रवींद्र नामदेव राऊळ (३५) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजुर केला. आरोपीच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

कथीत घटना २०२२ ते २७ ऑगस्ट २०२४ या कालावधीत घडली. पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती आपल्या घराजवळ असलेल्या ताडपत्रीच्या सहाय्याने बनविलेल्या बाथरुममध्ये आंघोळ करत असताना संशयित रवींद्र याने गुपचूप व्हीडिओ काढला. काही दिवसांनी त्याने तो व्हीडिओ विवाहितेला दाखविला. तो व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली. या धमकीच्या आधारे गेल्या दोन वर्षात त्याने विवाहितेकडून २ लाख ७० हजार रुपये उकळले. दरम्यान, २७ ऑगस्टला संशयिताने विवाहितेला गाठत पैशांची मागणी केली. तिने नकार दिला असता संशयिताने तिच्याशी अश्लिल संभाषण करत पुन्हा एकदा तो व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली, तसेच तीच्या अल्पवयीन मुलीशी देखील गैरवर्तन करण्याचा प्रयत्न आरोपीने केला होता. याबाबत भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५ (१) ७७ ३०८ (२) १२६ (२), ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. यात काही रक्कमा फिर्यादीने आरोपीला फोन पे द्वारे पाठविल्याचे तपासात स्पष्ट झाले होते.

आरोपीला दिवा येथून आटक केल्यानंतर मोबाईलही जप्त करण्यात आला होता. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपीतर्फे दाखल जामिन अर्जावर सुनावणी होत आरोपीची ५० हजाराच्या सशर्थ जामिनावर मुक्तता करताना अशाप्रकारचा गुन्हा पुन्हा करू नये, तपासात ढवळाढवळ करू नये, पोलिसांना सहकार्य करावे, आदी अटी घालण्यात आल्या आहेत.

error: Content is protected !!