श्रेयवादाच्या भोवऱ्यात अडकला तेरसे बांबर्डे ते मांडकुली येथील कर्ली नदिवरील VR 430 पूल..!!

पंचक्रोशीतील ग्रामस्थ नाराज
कुडाळ(प्रतीनिधी) – तेरसेबांबर्डे मळावाडी ते मांडकुली भोईवाडी दरम्यान ग्रामीण मार्ग 430 वर नाबार्ड अतंर्गत मोठ्या ब्रिजचे काम ९० टक्के पूर्ण झालेले असून याच ठिकाणी बॉक्सवेलसाठी केवळ ऐक ते दीड कोटी निधी उपलब्ध करून देणें तर दूरच,परंतु सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण यांनी कुडाळ तालुक्यातील एकही काम या आर्थिक वर्षात मंजुरीस घेतले नाही लोकांची तक्रार आहे.या विषयी नागरिक आश्यर्य व्यक्त करीत आहेत.तसेच राष्ट्रीय महामार्ग ते नदीपर्यंत जाणारा अंदाजे १०० /120 मी.लांबीचा रस्ता ग्रामपंचायत का करत नाही हा देखील पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ ते कर्ली नदीपर्यंत जाणारी १०० वर्षापासून पायवाट आजही अस्तित्वात व वापरात आहे.नदीवर पुलाचे बांधकाम होऊनही काही लोकांच्या आडमुठ्या धोरणामुळे या कामाला विलंब होऊ नये म्हणून लगतच्या सन्मानिय जमीनदारांनी आपल्या जमिनी ग्रामपंचायत तेरसेबांबर्डे जवळ विनामोबदला सार्वजनिक हित लक्षात घेऊन लेखी स्वरूपात दिलेल्या असून सर्व वयोवृद्ध जमीनधारक आपल्या एका हाकेला प्रतिसाद देऊन सर्वोतोपरी सहकार्य करण्यास तयार असून आपल्या गावाच्या विकासकरिता आपल्याला खारीचा वाटा उचलता आला या भावनेतून आपल्या हातून झालेल्या या सत्कार्याविषयी परमेश्वराचे आभार मानत आहेत.ही वस्तुस्थिती असताना लोकशाहीचे पवित्र मंदिरात असलेली तेरसेबांबर्डे ग्रामपंचायत आपल्या कर्तव्यापासून परावृत्त होत असल्याची जनतेची धारणा असून पंचक्रोशीत याबाबत पराकोटीचा असंतोष आहे त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.ग्रामस्थांची एकच मागणी आहे की आजपर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील तसेच आपल्या गावातील सार्वजनिक हितासाठी बनविण्यात आलेले सर्व रस्ते ज्या प्रकारे ग्रामपंचायत दप्तरी २३ नंबर ला नोंद करण्यात आले त्याच नैसर्गिक न्यायाने वर उल्लेखित रस्त्याची नोंद ग्रामपंचायत दप्तरी करून संबंधित शासकीय कार्यालयास तात्काळ अवगत करावे ही बाब पालकमंत्री .आमदार महोदय,मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग तसेच पंचायत समिती कुडाळ यांच्या यापूर्वी अनेकवेळा निदर्शनास आणून दिलेली असूनही केवळ कागदी घोडे नाचवण्या पलीकडे कोणतीही अपेक्षित कार्यवाही होत नसून, कधी नव्हे एवढा राजकारणाचा स्तर घसरल्याची जाणीव जनतेला होत आहे. त्यामुळे जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेच्या हिताच्या आड येणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात नाइलाजाने उपोषणाचा मार्ग पंचक्रोशीतील ग्रामस्थ उचलण्याचा विचार करत आहेत. .केवळ विकासाच्या वल्गना करणारे पुढारी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी हे हीन दर्जाचे राजकारण करून लोकांची दिशाभूल करत आहेत. याबद्दल पंचक्रोशीतील जनतेच्या मनात तीव्र संतापाची लाट असल्याचे बोलले जात आहे असे ब्रीजच्या कामाचा गेली दहा वर्षे पाठपुरावा करणारे समाजवादी कार्यकर्ते श्री प्रसाद धोंड यांनी सांगितले.