भाजप आणि मित्रपक्षांना सत्तेचा माज – खा. विनायक राऊत

खा. विनायक राऊत यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये काँग्रेसचा पक्षमेळावा
निलेश जोशी । कुडाळ : सध्याच्या सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षांना सत्तेचा माज आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा बळी त्यातूनच गेला आहे. राजकीय पक्षांची बँक खाती सील करण्यापर्यंत मोदी सरकारची मजल गेली आहे, हे लोकशाहीला घातक आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी केले. कुडाळच्या महालक्ष्मी सभागृहात आज महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात श्री. राऊत बोलत होते.
काँग्रेस पक्षाच्या या मेळाव्याला खासदार विनायक राऊत यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, आमदार वैभव नाईक, शिवसेना उबाठा गटाचे संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर, काँग्रेसचे विकास सावंत, साईनाथ चव्हाण, बाळू अंधारी, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारे, कुडाळ तालुका अध्यक्ष अभय शिरसाट,सुगंधा साटम, कुडाळच्या नगराध्यक्ष अक्षता खटावकर, विद्याप्रसाद बांदेकर, मेघनाद धुरी, तसेच शिवसेना उबाठाचे संजय पडते, संदेश पारकर, सतीश सावंत, अमरसेन सावंत, मंदार शिरसाट आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार विनायक राऊत पुढे म्हणाले, या अगोदर आमची जी युती होती त्यात मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत एकमेकांची समजूत वेळ जायचा. पण आता इंडिया आघाडीच्या बाबतीत तसे नाही. आपण वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहोत असे वाटत नाही. आपण सगळे एक आहोत. ही निवडणूक भारतमातेची आहे. या मुजोर सरकारने १४३ खासदार एका अधिवेशनात सस्पेंड केले. त्यामुळे महायुती निवडून आली तर पुन्हा एकदा ब्रिटिश राजवट आल्यासारखे होईल. भरात जोडो यात्रेतून इंडिया आघाडीचा जन्म झाला.आहे,असे खासदार राऊत म्हणले, नारायण राणेंवर टीका करताना श्री. राऊत म्हणाले, नारायण राणे हे एम्एसएमइ खात्याचे पहिले लाभधारक आहेत. त्यांनी . स्वतःच्या इमारतीत एम्एसएमइचे कार्यलय सुरू केले. त्याचे दीड लाख भाडे घेतात.. अशी टीका त्यांनी राणेंवर केली. लोकसभेपुरती आघाडी करून उपयोग नाही. पुढच्या सगळ्या निवडणुकीत आपली इंडिया आघाडी कायम ठेवूया असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख म्हणाले, देशात हुकूमशाहीचा वणवा पेटला आहे. तो विझवण्यासाठी तुमच्यासारख्या चिमण्यांची गरज आहे. . कॉंग्रेस अजून जिल्ह्यात संपलेली नाही. ती अजून भरभरत जाईल. देशात इंडिया आघाडी आहे. त्यामुळे मोदींच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विनायक राऊत हे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत. राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्यासाठी राउताना निवडून आणण्याची गरज आहे. मोदी त्यांनी गेल्यावेळी दिलेल्या आश्वासनांना गॅरेंटी म्हणत आहेत. पण ती आश्वासने पूर्ण झाली नाहीत, या .गोष्टी लोकांपर्यंत पोहचवा, असे आवाहन श्री. शेख यांनी कार्यकर्त्यांना केले.
आमदार वैभव नाईक म्हणाले, आज या व्यासपीठावर विकास सावंत आणि साईनाथ चव्हाण यांच्यासह सतीश सावंत आणि संजय पडते असे चार काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. त्यामुळे काँग्रेसला साथ देऊया. काँग्रेसचा पंतप्रधान बसवूया. काँग्रेसच्या विचारांचे आजही लोक गावागावात आहेत, त्याचा अनुभव काम करताना येतो. राणेंनी काँग्रेसमध्ये असताना सत्तेचे उपभोग घेतला आता भाजपच उपभोग घेत आहेत. देशामध्ये आज निवडणूक जिंकू शकलो नाही तर भविष्यात ते कठीण आहे. भाजप ईडीच्या कारवाई करत आहे. खासदार विनायक राऊत यांच्यावर सुद्धा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला. भाजपचे कार्यकर्ते लोकांपर्यंत जातात. मोदींच्या योजना सांगतात. पण त्या योजना पूर्वीपासूनच आहेत. मोफत धन्याचा निर्णय काँग्रेसच्या राजवटीत झाला होता. पण भाजप त्या योजना मोदींनी आणल्याचे सांगत आहेत. . इंदिरा आवास योजना आता मोदी आवास योजना म्हणून आणली गेली. महागाई वाढली आहे. मोदींच्या योजना फेल गेल्यात. प्रत्येक औषधांच्या किमती अडीज पट वाढल्या. मोदींच्या योजना बंद पडल्यात. नसलेल्या योजना सांगण्याचे काम भाजपवाले करत आहेत, याची जाणीव लोकांना करून द्या, असे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
यावेळी विजय प्रभू, विकास सावंत, साईनाथ चव्हाण, साक्षी वंजारे, मेघनाद धुरी यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. यावेळी आमदार बंटी पाटील यांनी दूरध्वनीवरून मेळाव्याला शुभेच्छा दिल्या. राऊत साहेबांना ताकतीने निवडून आणूया, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्याना केले. यावेळीखासदार विनायक राऊत यांच्या हस्ते केक कापून बंटी पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वरुणकर यांनी केले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.