संस्थान आचरा गावच्या कार्तिकोत्सवाची सांगता

आचरा–अर्जुन बापर्डेकर, संस्थान आचरे गावच्या गेला महिनाभर सुरू असलेल्या कार्तिकोत्सवातील पालखी सोहळ्याची सांगता रविवारी रात्रौ दिपोत्सवाने तर पहाटे सुरू असलेल्या काकड आरतीची सांगता सोमवारी पहाटे दहिहंडी फोडून करण्यात आली.
संस्थान आचरेगावचा सर्वात मोठा म्हणून कार्तिकोत्सव ओळखला जातो.कोजागिरी पौर्णिमा, ते त्रिपुरारी पौर्णिमा असा महिनाभर हा उत्सव सुरु असतो..यात रात्रौ पालखी सोहळा असतो तर पहाटे विठ्ठल मंदिरात काकड आरती रंगते.कार्तिक दशमीला आचरा वरचीवाडी येथील नारायण मंदिराला तर कार्तिक एकादशीला देवूळवाडी येथील विठ्ठल मंदिराला श्री विष्णू विराजीत पालखी भेट देते.त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी रामेश्वर मंदिर आणि दिपमाळा आकर्षक फुलांनी सजविण्यात येवून दिपोत्सव करण्यात आला होता. काही ठराविक वेळीच होणारे पंचमुखी महादेवाचे दर्शन त्रिपुरारी पूर्णिमेदिवशी होत असल्याने दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावर्षी या कार्तिकोत्सवात रंगत आणली ती देवूळवाडी,पारवाडी,वरचीवाडी बालगोपाळ मंडळांनी दशमी आणि त्रिपुरारी पोर्णिमेला रात्रौ सादर केलेल्या कथा दिंडींनी.
पहाटे विठ्ठल मंदिरातील काकड आरतीला प्रदक्षिणेनंतर पावल्यांचा फेर धरून दहिहंडी फोडून या सोहळ्याची सांगता करण्यात आली.तर पालखी उत्सवाची दिपोत्सवानंतर झाली.या सोहळ्यास भाविकांची अलोट गर्दी उसळली होती.





