मालवण कोमसापच्या येग येग सरी काव्यसंग्रहाचे प्रकाशन

“मालवण कोमसाप शाखेचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा” – मंगेश मसके
"कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा असे उल्लेखनीय साहित्यिक कार्य कोमसाप मालवणने केले आहे," असे उद्गार कोमसाप सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष श्री. मंगेश मसके यांनी ये ग ये ग सरी या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना काढले. बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे हा प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय सदस्य रुजारीओ पिंटो, कोमसाप मालवण अध्यक्ष सुरेश ठाकूर, सत्वश्री प्रकाशनचे प्रकाशक प्रमोद कोनकर, माधव गावकर, अनिरुद्ध आचरेकर, नवनाथ भोळे, गुरुनाथ ताम्हणकर उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंगेश मसके पुढे म्हणाले, "गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत कोमसाप मालवणने मराठी साहित्यात सिंधुसाहित्यसरिता, बीज अंकुरे अंकुरे, येग येग सरी या तीन पुस्तकांचे प्रकाशन करुन जवळजवळ शंभर लिहित्या हातांना साहित्यिक उभारी दिली आहे."
या प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटन मंगेश मसके, सुरेंद्र सकपाळ, विजय चौकेकर, चंद्रशेखर हडप यांच्या उपस्थितीत कवी केशवसुत प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाले. पाहुण्यांचे स्वागत स्मिता शितूत व दिपाली कांदळगावकर यांनी केले.
हा काव्यसंग्रह केशवसुत यांच्या मालगुंड येथील स्मारकाला अर्पण करण्यात आला. यानिमित्ताने माधवराव गावकर यांनी लिहिलेल्या अर्पण पत्रिकेचे त्यांच्याच स्वरात गायन केले. विद्याधर करंदीकर लिखित अक्षरांच्या आरतीच्या गायनाने माधवराव गावकर यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. गुरुनाथ ताम्हणकर यांनी संपादकांचे मनोगत वाचन केले. तर उज्वला धानजी यांनी काव्यसंग्रहाला ज्यांचे सहकार्य लाभले त्यांचा ऋणनिर्देश व्यक्त केला. सर्व पंचवीस कवींच्या वतीने चारुशीला देऊलकर यांनी काव्यसंग्रह निर्मितीमधील आनंद ओघवत्या शैलीत व्यक्त केला.
काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने रुजारीओ पिंटो, एकनाथ गायकवाड व सुनंदा कांबळे यांची काव्यमैफल आयोजित करण्यात आली. त्यांनी सादर केलेल्या कवितांनी उपस्थितांची मने जिंकली.
"बदलत्या प्रवाहाबरोबर आजच्या लेखकाने साहित्य टिकवणे व प्रसार करणे ही जबाबदारी स्वतः उचलली पाहिजे. आधुनिक तंत्राचाही आपल्या साहित्य निर्मितीमध्ये वापर करावा," असे आवाहन प्रकाशक प्रमोद कोनकर यांनी केले.
याच व्यासपीठावर कोकण मीडिया रत्नागिरी निर्मित 'दीपावली विशेषांकाचे' यावेळी प्रकाशन करण्यात आले. या अंकात 'आठवणीतला कोकण' या विषयावर विविध लेख असून वाचकांसाठी एक मेजवानी आहे, असे मत उपस्थित सदस्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी मंदार सांबारी यांनी सुस्वर सादर केलेल्या स्वलिखित भैरवीने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र कुबल यांनी केले. तर आभार ऋतुजा केळकर यांनी मानले. यावेळी सचिन केळकर, अनिकेत कोनकर, चंद्रशेखर हडप, त्रिंबक आजगावकर, कुमार कांबळे, सदानंद कांबळी, लक्ष्मणराव आचरेकर आदी मान्यवर व कोमसाप मालवणचे सदस्य उपस्थित होते.
मालवण (प्रतिनिधी)





