सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीवर आम्ही समाधानी – सुनिल तटकरे

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला अगोदरचा निकाल, राष्ट्रीय निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेले निकाल याच्या आधारीतच अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आमचा निर्णय…
दिल्ली – शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीची याचिका एकत्र घ्यावी अशी काहींची मागणी होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही याचिका वेगवेगळ्या आहेत. त्या वेगळ्याच पध्दतीने हाताळल्या जातील त्यामुळे राष्ट्रवादीच्या याचिकेवर सुनावणी ही ३१ जानेवारी २०२४ रोजी होईल असे आदेश दिले आहेत. आमचीही तीच मागणी होती. २ जुलै २०२३ रोजी जी याचिका दाखल केली आहे त्यामुळे एकत्रित निकाल आम्हाला मिळेल. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला अगोदरचा निकाल, राष्ट्रीय निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेले निकाल याच्या आधारीतच अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्णय घेतला आहे त्यामुळे आज झालेल्या सुनावणीवर आम्ही समाधानी आहोत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
शिवसेना फुटीसंदर्भात खूप मोठ्या संख्येने याचिका दाखल आहेत. पाच – सहा आमदारांवर याचिका दाखल असतील तर समजू शकतो परंतु दोन्ही बाजुच्या याचिका लक्षात घेतल्या तर अध्यक्षांनी जो काही निर्णय सांगितला तो त्यांचा अधिकार आहे. विधानसभा ही एक स्वायत्त संस्था आहे परंतु या देशाच्या व्यवस्थेत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असतो असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि तेही कायद्याच्या आधारावर टिकले पाहिजे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता ते दिले पाहिजे अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आदी उपस्थित होते.