कोविआचा ४५ सावा वर्धापनदिन उत्साहात

मुंबईत १५ ऑक्टोबरला वार्षिक सर्वसाधारण सभा

कणकवली:- कोकणातील मुंबईसह ६ जिल्ह्यांमध्ये विकास प्रश्नी कार्यरत असलेल्या कोकण विकास आघाडीचा ४५ सावा वर्धापनदिन नुकताच आघाडीच्या दादर – मुंबई येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा झाला. दरम्यान कोविआची ४५ सावी सर्वसाधारण सभा रविवार दि. १५ ऑक्टोबरला दुपारी ३.३० वाजता दादर-मुंबई येथील शारदाश्रम विद्या मंदिरच्या सभागृहात होणार आहे.

वर्धापनदिनी कोविआचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी राज्यातील राजकारणात पच्शिम महाराष्ट्रातील तत्कालीन प्रबळ सताधारी राजकारणी कोकणच्या विकास प्रश्नी सापत्नपणाची वागणूक देत होते. त्यामुळे कोकणातील तत्कालीन कार्यकर्त्यांनी कोविआचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर, दिवंगत सरचिटणीस कै. भागोजी सकपाळ, भाऊसाहेब परब, एन. एम. पाटील, सूर्यकांत पावसकर, कै. शंकर तारी आदींनी ४ ऑक्टोबर, १९७८ मध्ये कोकण विकास तरुण आघाडीची मुहूर्तमेढ रोवली. गावांच्या विकासासाठी शिक्षण, आरोग्य, वीज, रस्ते, पाणी पुरवठा ,एसटी वाहतूक, शेती बागायती आदी मुलभूत विकास प्रश्नांसह रत्नागिरी जिल्हा विभाजन करून सिंधुदुर्ग जिल्हा निर्मिती,मुंबई गोवा कोकण महामार्ग, पच्छिम किनारी सागरी महामार्ग, कोकण रेल्वे, पाटबंधारे प्रकल्प, औद्योगिक वसाहती आदी विकास प्रश्नी कोकणवासीयांना जागृत करून अनेक आंदोलने उभी केली. त्यामुळे सत्ताधारी राजकारण्यांना दुर्लक्षित कोकणच्या विकासासाठी लक्ष देणे भाग पडले, असे सांगून आजच्या पिढीला हा इतिहास माहित नाही. एक सामाजिक चळवळ म्हणून कोविआचे कार्यकर्ते गेली ४५ वर्षें निस्वार्थी बुध्दीने तन, मन आणि धन अर्पण करून कार्य करीत आहेत. मात्र दुर्दैवाने कोकणातील सर्वं पक्षिय लोकप्रतिनिधी पक्षीय हेव्यादाव्यांमुळे कोकणातील विकास प्रश्नी आजही संघटितपणे प्रयत्न करताना दिसत नाहीत. त्यामुळे अनेक विकास कामांचा बोजवारा वाजला आहे. अनेक प्रदुषणकारी प्रकल्प कोकणाच्या माथी मारुन कोकणचा भकास करण्याचे मनसुबे रचित आहेत. त्याविरोधात आवाज उठविला पाहिजे. मात्र त्यासाठी कोकणातील सामाजिक भान असलेल्या सुशिक्षितांनी कोविआच्या झेंड्याखाली एकत्र यायला हवे.

वर्धापनदिनानिमित्त कोविआचे पदाधिकारी, हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोविआच्या दि. १५ ऑक्टोबरला मोहन केळुसकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभेस कार्यकर्यांसह, हितचिंतकानी आणि कोकण विकासाची आच असलेल्या कोकणवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सरचिटणीस एकनाथ दळवी आणि पदाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

error: Content is protected !!