कणकवली शहरातील नळ योजना तब्बल चार दिवसांनी सुरू!

कणकवलीच्या नदीपात्रातील करकीची कोंड मध्ये शिवडाव धरणाचे पाणी दाखल!

महिन्याभरापासून मात्र जानवली नदीपात्रात पाणी सोडण्याचे आश्वासन हवेत

मान्सून केरळात आला तरी हरकुळ धरणाचे पाणी जानवली नदी पात्रात येईना

गेले चार दिवस कणकवली शहराचा ठप्प झालेला पाणीपुरवठा अंशतः सुरू झाला आहे. शिवडाव धरणाचे पाणी काल बुधवारी रात्री 11.30 वा. नळ योजनेची पाण्याची विहीर असलेल्या करकीची कोंड या ठिकाणी आले. त्यानंतर कणकवली नगरपंचायत च्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कणकवली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्या भरून आज सकाळपासून कणकवली शहरातील बहुतांशी भागाला पाणीपुरवठा सुरळीत केल्याची माहिती मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली. तर कलमठ येथील पाण्याच्या टाकीवरून शहरातील काही भागांना होणारा पाणीपुरवठा लवकरच सुरळीत करण्यात येणार असून तांत्रिक बिघाडामुळे हा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला नसला तरी आज हा पाणीपुरवठा सायंकाळपर्यंत सुरळीत केला जाणार आहे. कणकवली नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेले चार दिवस शिवडाव धरणाचे पाणी गड नदीपात्रात येण्याची प्रतीक्षा केली जात होती. कणकवली शहरवासी यांचे गेले चार दिवस पाण्याविना हाल झाले होते. या स्थितीत काल हे पाणी दाखल झाल्याने शहरातील बहुतांशी भागाला पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला असल्याची माहिती नगरपंचायत कडून देण्यात आली. दरम्यान एकीकडे कणकवली नगरपंचायत हद्दीतील नळ योजना अंशतः सुरू झालेली असताना गेले पंधरा दिवसाहून अधिक काळ जानवली नदी पात्रात पाणी सोडले असे सांगणारे प्रशासन याकडे मात्र आजही डोळेझाक करत आहे. जानवली नदीपात्रालगत सर्वच ग्रामपंचायती या भाजपच्या ताब्यात असून भाजपाचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी देखील यापूर्वी अनेकदा लेखी मागणी केली होती. मात्र त्यांना देखील तहसीलदार स्तरावरून पाणी सोडण्याचे सांगितले गेले. तर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यानी पाणी सोडले आहे लवकरच येईल असे पंधरा दिवसापूर्वी सांगितले. मात्र या नदीपात्रालगतच्या सर्वच नळ योजना सध्या पाण्या अभावी बंद स्थितीत आहेत. त्यामुळे कणकवली शहराच्या पाणी प्रश्नावर प्रशासनाने ताकद लावून तोडगा काढला. मात्र जानवली नदीपात्रात पाणी येण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी पडते का? असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. एकीकडे मान्सून अंदमनातून केरळात आला. मात्र हरकुळ धरणाचे पाणी जानवली नदीपात्रात कशामुळे येईना? असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!