पिंगुळी पाझर तलाव प्रश्नी मनसे ग्रामस्थांसोबत

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केले स्पष्ट

गळचेपी खपवून घेणार नाही ; दिला इशारा

पिंगुळी-देऊळवाडी येथील पाझर तलावातील पाणी दूषित प्रकरणी ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनास मनसेने जाहीर पाठिंबा दिला आहे. प्रशासनाने ग्रामस्थाच्या मागण्या गांभीर्याने घ्याव्यात. तसेच आर्थिक बळाच्या जोरावर प्रशासनाला हाताशी धरून परप्रांतीयांकडून होणारी गळचेपी खपवून घेणार नाही असा इशारा मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. किनळेकर म्हणतात, पिंगुळी देऊळवाडी येथे पाझर तलावाला लागून परप्रांतीय विकासकामार्फत चुकीच्या पद्धतीने गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येत आहे. सदर गृहनिर्माण प्रकल्पामुळे भविष्यात त्या ठिकाणच्या पाझर तलावाला धोका निर्माण होणार आहे. देऊळवाडी पाझर तलावामुळे पूर्ण पिंगुळी गावाला शुद्ध पाणी पुरवठा होत असुन आगामी काळात पिंगुळी गाव ज्या झपाट्यानं शहरीकरणाकडे वाटचाल करत आहे ते पाहता भविष्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्न जटिल होऊ शकतो.
मनसेचा विकासाला अजिबात विरोध नाही. परंतु स्थानिकांना विचारात न घेता तसेच स्थानिकांवर अन्याय करून बळजबरीने पैशाच्या जोरावर लादलेला एखादा प्रकल्प जर गावाला घातक ठरणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थानिकांच्या सोबत राहून अशा प्रकल्पाला ठासून विरोधच करेल.
तिनही बाजुने डोंगर आणि तळाशी तलाव अशी भौगोलिक परिस्थिती असताना भविष्यात शेकडो रहिवाशांचे वास्तव्य असलेल्या बंगल्यांचे मलमूत्र सहीत सांडपाणी नैसर्गिक नियमानुसार सखल भागातील तलावात जाणार आहे. डोंगर पोखरून शेकडो बंगले बांधताना डोंगराची माती तलावात गाळरुपी साठणार असुन तलावाची पाणी साठवण क्षमता कमी होणार आहे.
संपूर्ण चारही बाजुने विकासकाची खाजगी जमिन आणि सरकारी तलाव मध्य भागी आहे . भविष्यात जुन्या नळपाणी योजनेचे पाईप आणि नवीन पाईप लाईन हे खाजगी जमिनीत असल्याने दुरुस्ती, गाळ उपसा सारखे विषय हाताळताना विकासकाची मनमानी होणार आहे. सध्या तलाव लघु पाटबंधारे विभागाकडे आहे. भविष्यात त्या तलावावर जायला पण मार्ग राहणार नाही आहे. एवढी भिषण समस्या पिंगुळी गावावर ओढवणार आहे. सरपंच आणि दोन-चार सदस्याच्या वैयक्तिक फायद्या करिता अख्खा गाव वेठीस धरला जात आहे.
पिंगुळी ग्रामस्थांनी भविष्यातील हे संकट ओळखुन आताच एकजुटीने याला विरोध केला पाहीजे. जसा सासोली ग्रामस्थांनी एकजुटीने याच मुजोर परप्रांतीय विकासकाला आपल्या गावात थारा दिला नाही, म्हणून हाच प्रकल्प पिंगुळी ग्रामस्थांच्या माथी थोपवू पाहत आहे. याचमुळे मनसे ग्रामस्थांसोबत वेळोवेळी या आंदोलनात सहभागी होणार आहे, असे श्री. किनळेकर यांनी पत्रकात म्हटले आहे.

error: Content is protected !!