नोटबंदी नंतरही सत्ताधाऱ्यांकडे रोख पैसा येतो कुठून ?

आमदार भास्कर जाधवांचा सवाल

कुडाळ मध्ये ठाकरे सेनेचा मेळावा

आजच्या सत्ताधाऱ्यांकडे निवडणुकीसाठी अमाप पैसा येतो कुठून? नोटबंदीनंतरही हा पैसा कसा येतो? तो काळा आहे की पांढरा? असा थेट आणि परखड सवाल उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. पुढील पिढीच्या भवितव्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच सज्ज व्हावे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका एकदिलाने लढाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज कुडाळ महालक्ष्मी हॉल मध्ये झाली. शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत आणि आमदार भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. यावेळी अरुण दुधवडकर, गौरीशंकर खोत, वैभव नाईक, परशुराम उपरकर, सतीश सावंत, बाबुराव धुरी, संदेश पारकर, नितीन वाळके, जान्हवी सावंत, श्रेया परब, अमरसेन सावंत, मंदार शिरसाट, सुशांत नाईक, बबन बोभाटे, अतुल बंगे, संदेश नाईक, नीलम पालव आदि मान्यवर उपस्थित होते.
     आ. भास्कर जाधव पुढे म्हणाले,आज किती मतांनी निवडून आलो हे महत्त्वाचे नाही; तर भस्मासुर प्रवृत्तीच्या विरोधात उभे राहिलो, हेच खरे महत्त्वाचे आहे. पूर्वी सिंधुदुर्ग–रत्नागिरी एकच जिल्हा होता. या भूमीने विचारवंत, साहित्यिक दिले आहेत. इथली कोकणी माणसं लढवय्यी आहेत.आज जर पैसे वाटून उमेदवार निवडून येऊ लागले, तर समाजाची मोठी अधोगती होईल. ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांच्या नावाखाली सरकारी तिजोरीतून पैसे वाटणे हा सत्ताधाऱ्यांचा फंडा आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
खासदार अरविंद सावंत म्हणाले, पैशाने विकली जाणारी लोकशाही तुम्हाला मान्य आहे का? कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. सिंधुदुर्ग आणि मुंबईचे नाते वेगळे आहे. मुंबई आपल्या विचारांच्या ताब्यात राहिली पाहिजे.कोकणने नेहमी विचारधारेचा खासदार दिला आहे. मात्र आज विचारधारेकडून विचारशून्यतेकडे वाटचाल सुरू आहे. तरीही शिवसेना संपलेली नाही; आजही इथे निखारे जिवंत आहेत, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले.
उपनेते गौरीशंकर खोत म्हणाले, संदेश पारकर यांच्या विजयामुळे संपूर्ण जिल्ह्यात नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. एकजुटीने लढलो म्हणूनच कणकवलीत विजय मिळाला. विजय हा विजयच असतो. येणाऱ्या निवडणुका ताकदीने आणि एकदिलाने लढू,असे आवाहन त्यांनी केले.
      संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. शिवसेनेने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आतापासूनच तयारीला लागा. असे आवाहन केले.
      माजी आमदार वैभव नाईक म्हणाले,सत्ता असते तेव्हा सत्तेसोबत येणारे लोकही असतात. मात्र आपले कार्यकर्ते सत्तेसाठी नाही, तर विचारांशी प्रामाणिक आहेत. पैशासमोरही आपण ताकदीने लढलो असून आपली लढाई व्यर्थ जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी आमदार जी. जी. उपरकर म्हणाले,
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार पैसे न वाटताही विजयी होऊ शकतात, हे या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. एकजूट ठेवली, तर सत्ता आपलीच असेल. असा विश्वास व्यक्त केला.
संदेश पारकर म्हणाले, म्हणाले, तुमच्या आशीर्वादामुळे मला नगराध्यक्षपद मिळाले. आता जनतेचा विश्वस्त म्हणून ही जबाबदारी पार पाडेन. कार्यकर्त्यांनी सन्मानाने काम करावे आणि नेत्यांनीही सामान्य कार्यकर्त्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बदललेली राजकीय परिस्थिती आत्मसात केल्याशिवाय यश शक्य नाही. असे स्पष्टपणे सांगितले.
यावेळी कणकवली नगराध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल संदेश पारकर यांचा सत्कार करण्यात आला. तसंच ठाकरे सेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं ठाकरेसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन बबन बोभाटे यांनी केले तर आभार नगरसेवक सुशांत नाईक यांनी मानले.

error: Content is protected !!