गार्गी आणि इतर एकांकिका पुस्तकात मानवी नात्यांचं सहज सुंदर भाष्य – कवी अजय कांडर

नाटककार उदय जाधव लिखित ग्रंथाचे मुंबई रवींद्र नाट्य मंदिर मध्ये प्रकाशन
अभिनेत्री मेघा घाडगे, केतकी नारायण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
कोकण सुपुत्र नाटककार उदय जाधव लिखित "गार्गी आणि इतर एकांकिका" या नाट्य पुस्तकात मानवी नात्यांचं सहज सुंदर भाष्य असून उदय जाधव हे आपल्या मूळ परंपरेचा शोध घेणारे सशक्त असे मराठी रंगभूमीवरचे आजचे महत्वाचे नाटककार आहेत असे प्रतिपादन नावांत कवी तथा नाटककार अजय कांडर यांनी केले.
बोधिवृक्ष फाऊंडेशन निर्मित उदय जाधव लिखित, दिग्दर्शित "देवानंपिय असोक" या नाटकाचा २५ वा रौप्यमहोत्सवी प्रयोग सोहळा कवी अजय कांडर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री नृत्यांगना मेघा घाडगे यांच्या उपस्थिती मुंबई प्रभादेवी रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला.या निमित्ताने कोकण सुपुत्र या नाटकाचे लेखक - दिग्दर्शक उदय जाधव लिखित "गार्गी आणि इतर एकांकिका" या नाट्य पुस्तकाचे प्रकाशन कवी कांडर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध अभिनेत्री नृत्यांगना मेघा घाडगे यांच्यासह नाट्य - सिने अभिनेते संदेश जाधव, संदीप गायकवाड, सुनील जाधव, प्रितेश मांजलकर सुप्रसिद्ध अभिनेत्री केतकी नारायण, दिपश्री माळी तसेच बुक स्टार प्रकाशनाचे अस्मिता चांदणे, दीपक चांदणे उपस्थित होते.
कवी कांडर म्हणाले उदय जाधव हे मराठी रंगभूमीवरील लक्षवेधी तरुण दिग्दर्शकांपैकी एक महत्त्वाचं नाव असून त्यांचे "देवानंपिय असोक" हे आपल्या मूळ परंपरेचा शोध घेणारे वेगळे नाटक बहुचर्चित ठरले आहे. सम्राट अशोकाच्या विषयावर, अभिव्यक्ती आणि कलात्मक स्वातंत्र्याचा गैरफायदा न घेता. इतिहासाशी प्रतारणा न करता तो वास्तववादी रंगभूमीवर नाटक रूपाने मांडणं. हे एक मोठे आव्हान होते. हे आव्हान उदय जाधव यांनी यशस्वीरित्या पेलले आहे.
अभिनेते संदेश जाधव म्हणाले कि, उदय जाधव यांच्या "गार्गी आणि इतर एकांकिका" हे पुस्तक प्रकाशन झालंय हे छान वाटत. मला हे पुस्तक वाचायला खूप आवडेल. उदय यांच्या एकांकिका पाहिल्या आहेत. आता वाचनाचा वेगळा आनंद घेता येईल. उदय आणि सर्व टीमला मनःपूर्वक शुभेच्छा!
उदय जाधव म्हणाले इतकं प्रेम नाटकाला मिळतंय, फार आनंद होतोय, छान वाटतय. "गार्गी आणि इतर एकांकिका" हे पुस्तक वाचक म्हणून अभ्यासावे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करावा. कार्यक्रमाचे सूत्रसंचन अभिनेते निलेश भेरे यांनी केले. यावेळी नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.