खा.नारायण राणे यांनी साकवांसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे वेधले लक्ष

जिल्ह्यातील साकव दुरूस्तीसाठी विशेष निधी द्या
तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नादुरूस्त साकव दुरूस्त करण्यासाठी तातडीने विशेष निधी उपलब्ध करुन द्या अशी मागणी खा.नारायण राणे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र मंत्री गोरे यांना देतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेत साकव किती महत्वाचे आहेत याकडेही खा.राणे यांनी लक्ष वेधले आहेत. साकव दुरुस्तीसाठी ३८ कोटींची गरज आहे.
जिल्ह्यात सध्या ८६० साकव असून यामधील ४५८ साकव हे मोडकळीस आले असून नादुरूस्त आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भाग हा डोंगराळ असून विविध तालुक्यातील गावे व दुर्गम वस्त्या यांना कायम स्वरूपी किमान संपर्काच्या दृष्टीने साकवांची गरज आहे. शिवाय पावसाळ्यात ये-जा करण्यासाठी अनेक वेळा साकव हा पर्याय असतो. परंतु अनेक साकव हे नादुरूस्त असून त्यावरून रहदारी करणे धोक्याचे ठरते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोडकळीस आलेले साकव दुरूस्त करण्यासाठी ३८ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, असे खा.नारायण राणे यांनी मंत्री जयकुमार गोरे यांना पत्र देतानाच जिल्ह्यावासीयांच्या सेवा सुविधांसाठी तातडीने निधी देण्याबाबतची विनंती खा.राणे यांनी केली आहे.