पोलीस पाटील हा गावच्या व्यवस्थेतील कणा, आपत्ती काळात सतर्क राहणे गरजेचे!

कणकवलीत आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत एनडीआरएफ च्या टीमकडून तालुक्यातील पोलीस पाटलांना मार्गदर्शन
आपत्ती काळातील अनेक प्रात्यक्षिके व मार्गदर्शन
आपत्ती काळामध्ये गावातील ग्रामस्थांमध्ये सतर्कता ठेवण्याबाबत सूचना द्या. तसेच पुरस्थिती आल्यास मदत कार्य कसे करावे? नदीकाठच्या गावांनी कशाप्रकारे सतर्कता बाळगली पाहिजे? तसेच पोलीस पाटील म्हणून तुम्ही काय उपाययोजना केल्या पाहिजेत यासह आपत्ती व्यवस्थापनाच्या भूमिकेत पोलीस पाटलांची महत्त्वपूर्ण भूमिका काय असली पाहिजे या अनुषंगाने पुणे येथील एनडीआरएफ पथकाच्या टीम च्या मार्फत या टीमचे कमांडर नितीन साकोशी यांनी कणकवली तालुक्यातील पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले. कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या माध्यमातून या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कणकवलीतील एचपीसीएल हॉलमध्ये हे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यामध्ये कणकवली तालुक्यातील 73 पोलीस पाटील उपस्थित होते. या प्रसंगी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, निवडणूक नायब तहसीलदार विजय वरक यांच्यासह अन्य उपस्थित होते. यावेळी पोलीस पाटलांना मार्गदर्शन करताना पूरस्थितीच्या वेळी पाणी पातळीत वाढ झाल्यास काय उपाययोजना कराव्यात? तसेच ग्रामीण भागात सर्पदंश झाल्यास त्या व्यक्तीवर प्राथमिक उपचार कशा प्रकारे केले पाहिजेत . तसेच हृदयविकाराचा झटका किंवा पाण्यात बुडालेल्या माणसाला कृत्रिम श्वाशोच्छवास कसा द्यावा याबाबतचे प्रात्यक्षिकही यावेळी एन डी आर एफ चे कमांडर नितीन साकोशी व त्यांच्या टीमने दिले. एन डी आर एफ ची 20 जणांची ही टीम कणकवलीतील पोलीस पाटलांना प्रशिक्षण देण्यासाठी आली होती. यासोबत घशात काही अडकल्यास ते कशाप्रकारे तात्काळ काढायचे? आपत्तीच्या काळामध्ये एखाद्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढायचे असेल तर मॅन्युअल पद्धतीने स्ट्रेचर कसे तयार करावे? आगीत अडकलेल्या नागरिकांना कशाप्रकारे बाहेर काढावे? आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन यासह अनेक प्रकारचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी देखील याप्रसंगी मार्गदर्शन केले. पोलीस पाटील हा गावातील प्रशासकीय व्यवस्थेचा कणा असून पोलीस पाटलांनी आपत्तीच्या काळामध्ये सतर्क राहिले पाहिजे. पोलीस पाटलांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन आपण पूर्णपणे यशस्वी करू शकतो. जेणेकरून अडचणीत असलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढणे तसेच आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनाशी पोलीस पाटलांनी संपर्क साधून प्रशासनाला घटनेची माहिती द्यावी. जेणेकरून आपत्तीवर वेळीच नियंत्रण करता येईल. असेही यावेळी सांगण्यात आले. पोलीस पाटलांनी गावातील अन्य प्रशासकीय व्यवस्थेशी संपर्कात राहून आपत्ती व्यवस्थापन समिती गठीत करून कार्यरत राहणे गरजेचे आहे. यावेळी एनडीआरएफच्या पथकाने अनेक प्रकारची प्रात्यक्षिके दाखवत मार्गदर्शन देखील केले.