पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आणि फळपिकांच्या विमा नुकसान भरपाईचा तपशील देण्याचे जिल्हा कृषी अधिक्षकांनी काढले आदेश

शिवसेना शिष्टमंडळाच्या मागणीची जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिक्षक यांनी घेतली दखल

     शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने काल जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन विविध पिकांच्या नुकसान भरपाईबाबत केलेल्या मागणीची दखल जिल्हाधिकारी अनिल पाटील व जिल्हा कृषी अधिक्षक भाग्यश्री ननावरे यांनी घेतली आहे. कोकम, आंबा, उन्हाळी भुईमुग, नागली, चवळी तसेच भाजीपाला, भात रोप वाटीकांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून बाधित क्षेत्राचा अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचबरोबर आंबा, काजू व केळी या फळपिकांच्या विम्याच्या नुकसान भरपाईचा तपशील आठ दिवसांच्या आत उपलब्ध करून देण्याची सूचना भारतीय कृषी विमा कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकांना पत्राद्वारे करण्यात आली आहे. 

       मे महिन्यात मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडल्याने आंबा, कोकम, जांभूळ, फणस, भुईमूग, नागली,चवळी यांसह अन्य पिकांचे नुकसान झाले असून त्याची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी त्याचबरोबर विमा उतरविलेल्या आंबा,काजू,केळी या फळपिकांचे देखील नुकसान झाले असून ३० जून २०२५ पूर्वी फळपिक विमा नुकसानीचे टिगर जाहीर करण्याचे आदेश कृषी विभाग व विमा कंपनीला देण्यात यावेत या मागण्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने काल  जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट घेऊन केल्या होत्या त्याबाबतचे निवेदनही दिले होते. त्यावर  जिल्हा कृषीअधिक्षक यांनी पिकांच्या  नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन,फळपिकांच्या विम्याच्या नुकसान भरपाईचा तपशील जाहीर करण्याच्या सूचना देऊन कार्यवाही सुरु केली आहे. त्याबद्दल शिवसेना शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले असून लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

error: Content is protected !!