मालवण तहसील कार्यालयासमोर तळाशील ग्रामस्थ छेडणार ठिय्या आंदोलन

महसूल प्रशासनाविरोधात तळाशील ग्रामस्थ आक्रमक
कालावलं खाडीपत्रात तळाशील किनारी बेकायदेशीर वाळू उपसा विरोधात तळाशील ग्रामस्थ गेली आठ ते दहा वर्षे आंदोलन करत आहेत मात्र महसूल प्रशासनाकडून कोणताही न्याय मिळत नाही. बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या बोटी ग्रामस्थांनी पकडून दिल्यावर महसूल प्रशासन शुल्लक दंड आकारून बोटी सोडून देत आहे. एखादी घटना घडल्यानंतर वाळू माफि्यांची मर्जी सांभाळण्यासाठी खोट्या केसेस दाखल करून गंभीर गुन्ह्यांची कलमे प्रशासाकडून ग्रामस्थांवर लावली जात आहेत. आपली वस्ती, माड बागायती वाचवण्यासाठी धपडणाऱ्या ग्रामस्थांचा आवाज दडपण्यासाठी खोटे केसेस मध्ये अडकवून ग्रामस्थांचा आवाज दबवण्याचा डाव प्रशासन रचत असल्याचा आरोप तळाशील ग्रामस्थांनी करत वाळू माफीयांना पाठीशी घालणाऱ्या महसूल प्रशासना विरोधात मालवण तहसीलदार कार्यलयासमोर येत्या आठ दिवसात ठिय्या आंदोलन छेडणार असल्याचा निर्धार तळाशील येथे झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी केला आहे.
यावेळी तळाशील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष संजय केळुसकर, तोडवळीचे माजी सरपंच जयहरी कोचरेकर, ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र मेस्त, भोपाळ मालंडकर, ताता टिकम, संजय तारी, भरत कोचरेकर, केशर जुवाटकर, महेश तारी, धर्माजी कोचरेकर, मनीषा तारी, मंजुषा चोडणेकर, रिया कोचरेकर, जान्वी पराडकर,तसेच महिलां ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. बेकायदेशीर वाळू उपसा विरोधात तळाशील ग्रामस्थ सातत्याने आंदोलन करत आहेत मात्र मुजोर महसूल प्रशासन त्यावर डोळेझाक करत आहे. सातत्याने वादाचे प्रसंग उद्भवत असताना महसूल प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. काही दिवसापूर्वी असेच मासेमारीसाठी गेलेल्या युवकांनी बेकायदेशीर उपसा करणाऱ्या बोटीना हुसकावून लावले त्यावेळी वाळूकामगार पळून गेलेत तेव्हा एक कामगार पाण्यात पडून मृत्यू पावला या घटनेशी तळाशील येथील युवकांचा कोणताही संबंध नसताना प्रशासनाने वाळू माफियाची मर्जी राखण्यासाठी तळाशील येथील युवकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्याना अडकवले आहे. खोटे केसेस मध्ये अडकवून ग्रामस्थांचा आवाज दबवण्याचा डाव प्रशासन करत असल्याचा आरोप तळाशील ग्रामस्थांनी केला असून याविरोधात आमचा लढा कायम चालू राहणार असल्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी बोलून दाखवला.
वाळू टेंडरचे गट हे साधारणपणे वाघेश्वर मंदिर पासून ते पुढे भगवन्तगड पर्यंत सुरु होतात मात्र असे असताना उपसा हा बेकायदेशीपणे रेवंडी तसेच तळाशील खाडिकिनारी केला जातो वाळू टेंडर प्रोसेस करताना तोंडवळी ग्रामपंचायला कोणताही महसूल मिळत नाही टेंडर प्रोसेस करताना परवानगी इतर गावाच्या ग्रामपंचायतीच्या घेतल्या जातात आणि वाळू उपसा हा तळाशील किनारी केला जातोय वाळू टेंडरच्या परवानग्या एकीकडे उपास मात्र दुसरीकडे असा प्रकार महसूलच्या आशीर्वादाने होत असल्याचा आरोप यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी केला देशात मागे अतिरेक्यांनी किनारी मार्गाने घुसून दहशतवादी हल्ले केले होते. त्यानंतर सतर्क झालेली सुरक्षा यंत्रणा ही कुठलीही नाव, नंबर नसलेली बोट जप्त करत असत. मात्र आता आशा परवाना नसलेल्या बोटी खाडीत राजरोस वापरल्या जात आहेत. वाळू उपसा करणाऱ्या बोटीवर कुठलाही नाव नंबर किंवा होडी अधिकृत असल्याचा पुरावा नसतो. अनधिकृत बोटी वापरून वाळू उपसा केला जात आहे याकडे जाणीवपूर्वक बंदर विभाग दुर्लक्ष करत आहे स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन करून आशा बोटी पकडून दिल्या त्यावेळी अधिकाऱ्यांनी कारवाईचे नाटक करत नाममात्र दंड करून अशा बोटी सोडून दिल्या जात आहेत. मर्यादित वाळू परवाने असताना दिवसाला दोनशेहुन अधिक डम्पर वाळू वाहतूक करत आहेत असा आरोप ग्रामस्थांनी केला.
आज अन्यायाविरोधात तळाशील येथील ग्रामस्थ आंदोलन उभारत आहेत आमचा लढा हा स्वार्थासाठी नसून आम्ही न्याय हक्कासाठी, आमच्या जगण्यासाठी आहे. याविरोधातील लढा बळकट व्हावा, यशस्वी व्हायला हवा तर समाज बांधव तसेच सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी तसेच पर्यावरणप्रेमी संस्था यांचीही साथ हवी आहे. म्हणूनच इतर गावातील ग्रामस्थांनी किंवा संस्थांनी तसेच समाज बांधवांनी, सामाजिक संस्था यांनी आमच्या लढ्यास पाठींबा द्यावा अशी साद तळाशील ग्रामस्थांनी यावेळी घातली आहे.