भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांना पोलीस संरक्षण

सावंतवाडी – भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांना पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने नुकताच घेतला आहे. विशाल परब यांच्यासारख्या शांत संयमी युवा नेतृत्वाला त्यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्याची आवश्यकता प्रशासनाला का वाटली असावी? असा प्रश्न विचारला जात आहे. हे कोण आहेत ज्यांच्यापासून विशाल परब यांच्या जीवीताला धोका आहे याबाबत पोलिसांकडे योग्य तो अहवाल असेलच. पण विशाल परब यांना पोलीस प्रशासनाने पुरवलेल्या संरक्षणानंतर जनमानसात मात्र चर्चांमधून अनेक प्रश्नचिन्हे उमटू लागली आहेत.
महात्मा गांधींनी सावंतवाडी संस्थानाला रामराज्य असे म्हटले होते. सावंतवाडीकर जनता ही शांतताप्रिय आणि लोकशाहीची बूज राखून आपले रोजचे व्यवहार करणारी जनता आहे. राजकारणातला दहशतवाद, दादागिरी किंवा राडेबाजी अशा प्रकारांना ही जनता कधीही थारा देत नाही. राजकारणाचा विचार केला तर दीपक केसरकर यांच्यासारखा आमदार मतदार संघाबाहेरील अन्य नेत्यांच्या दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करून आणि आपली शांतताप्रिय व्यक्तिमत्व ही छबी प्रस्थापित करून मागील तीन टर्म आमदार पदावर आहे.
पण या वेळचे बदललेले राजकारण सावंतवाडी मतदारसंघातील जनतेलाही अस्वस्थ करत आहे. या मतदारसंघातील अस्थिर राजकीय परिस्थिती, आमदार दीपक केसरकरांबाबत जनतेमध्ये असलेली प्रस्थापितांविरोधी लाट, महायुतीतील भाजपच्या नेत्यांनी दीपक केसरकरांवर त्यांनी वेळोवेळी दिलेल्या निष्फळ आश्वासनांबाबत आरोप, त्यांना दर्शवलेला उघड विरोध, हवेचा रुख ओळखून दीपक केसरकर आपले टोकाचे राजकीय हाडवैर असलेल्या नारायण राणेंशी साधलेली जवळीक, काल-परवापर्यंत ज्यांच्या दहशतवादाच्या मुद्द्यावर आपले राजकारण करत सावंतवाडीकर जनतेशी भावनिक संवाद साधला, त्याच नारायण राणे यांच्या दहशतवादावर मारलेला यु टर्न आणि मारलेली राजकीय प्रेमाची मिठी या सगळ्यातून सावंतवाडीचे समाजमन राजकारणाबाबत अस्वस्थ झाले आहे. तिकिटासाठी काहीही करणाऱ्या नेत्यांबद्दल जनतेच्या मनात उघड तिटकारा निर्माण झाला आहे.
दुसरीकडे, सावंतवाडीच्या शांत संयमी राजकारणाच्या संस्कृतीला अनुसरून भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ही जबाबदारी असलेल्या विशाल परब यांनी जनतेमध्ये आपले सेवाभावी काम बऱ्यापैकी रुजवले आहे. हाती कोणतेही संविधानिक पद नसताना आपल्या भाजयुमो कार्यालयातून त्यांनी अक्षरशः हजारो लोकांना त्यांच्या अडीअडचणीत मदतीचा हात दिला. कोणाच्या आजारपणात, कोणाच्या शिक्षणासाठी, पावसात कोसळलेल्या घरांसाठी हक्काचा आधार म्हणून जनता विशाल परब यांच्याकडे पाहू लागली. वेंगुर्ल्याच्या टोकापासून ते दोडामार्गच्या दुर्गम गावांपर्यंत त्यांनी जनतेशी थेट संपर्क ठेवला. शांत मनमिळाऊ स्वभाव, पैशाची जराही नसलेली घमेंड, कोणाशीही हसतमुखाने बोलणे, अस्सल गावरान मालवणीत बोलत क्षणात गावकऱ्यांशी आपुलकीचे नाते निर्माण जोडणे आणि अडचणीत, sankta सर्वांच्या मदतीला धावून जात खिशात हात घालून तात्काळ मदत करणे यातून विशाल परब लोकांना आपले हक्काचे माणूस वाटतात. त्यांची लोकप्रियता जनमानसात वाढीला लागली. विशेषतः खेड्यापाड्यातील युवकांच्या गळ्यातले तर विशाल परब हे ताईत बनले. कोकणात उदयाला येणारा हा नवा “युथ आयकॉन” अनेक राजकारण्यांच्या नजरेत भरू लागला आणि त्यामुळेच तो अनेकांना सलायलाही लागला.
जुबिन नौटीयालसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय स्टार सेलिब्रेटीना आणत सावंतवाडी सारख्या भागात भरवलेले लाखोंच्या उपस्थितीतील भव्य इव्हेंट्स, शिवगर्जनासारखे बिगबजेट महानाट्याचे सिंधुदुर्गातील जनतेसाठी तब्बल आठवडाभर मोफत प्रयोग सादर करण्याचे प्रयोजन करणे, ह.भ.प इंदुरीकर महाराज यांची कीर्तने प्रवचने जनतेसाठी आयोजित करणे या बरोबरीने महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, युवा वर्गासाठी रोजगार महोत्सव यातून घडणारे विशाल परब नावाचे हे युवा नेतृत्व आपल्या कर्तुत्वाचे क्षितिज ओलांडून राज्यभरात वेगळे वलय उभे करू लागले आहेत, ही बाब अनेक प्रस्थापितांना अस्वस्थ करू लागली होती.
विशाल परब हे आपल्या पंखाखाली असावेत असे अनेकांना वाटत होते, पण कालपरवाच्या या युवकाने घेतलेली गरुडझेप अशा अनेकांना आता अडचणीची वाटू लागली होती. मागील आठवड्यात जेव्हा विशाल परब यांनी सावंतवाडी मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषदेला एक अशा एकूण सहा रुग्णवाहिका देण्याचा कार्यक्रम पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर केला, आणि अक्षरशः सावंतवाडीच्या मोतीतलावावर वीस ते पंचवीस हजार मतदारांच्या उपस्थितीत तो यशस्वी केला, तिथूनच विशाल परब हा युवक सावंतवाडीच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला. या विशाल शक्ती प्रदर्शनानंतर, त्यातही महिला आणि युवक यांच्या अफाट गर्दीनंतर विशाल परब यांना वगळून सावंतवाडी मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा विचार होऊ शकत नाही, हा संदेश राजकीय वर्तुळाला गेलाच.
अवघ्या पस्तीशीतल्या या युवकाला राजकारणातून बाद करण्यासाठी अनेक कट कारस्थाने यादरम्यान घडल्याचे समजते. हा कार्यक्रम होऊ नये यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी आपली मोठी ताकद व दबाव वापरला, आणि हा दबाव झुगारून टाकत विशाल परब यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला. पण याच कार्यक्रमाच्या व्यासपीठावर बोलताना त्यांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एक गोष्ट बोलून दाखवली होती. ते म्हणाले होते की काहीजण माझ्या जीवावर उठले आहेत, परमेश्वर त्यांनाही चांगली बुद्धी देवो.
कोण होते ते विशाल परब यांच्या जीवावर उठलेले? कोण होते ते राजकारणी ज्यांना विशाल परब यांचे राजकारण मोडून टाकायचे होते? त्यांचे अस्तित्वच खोडून टाकण्यासाठी ताकद लावली जात होती, त्यांना धमक्या केल्या जात होत्या? ते प्रश्न त्या कार्यक्रमानंतर काही काळ अनुत्तरीत राहिले, मात्र आज पोलीस प्रशासनाने त्यांना संरक्षण दिल्याने हे प्रश्न जनतेच्या मनात पुन्हा निर्माण झाले आहेत.
खडतर परिस्थितीशी संघर्ष करत स्वतःच्या आर्थिक हिम्मतीवर राजकारण एका वेगळ्या सामाजिक दिशेने घेऊन जाणाऱ्या या यशस्वी युवा राजकारण्याचे खरे तर कौतुक व्हायला हवे. कोणत्याही शासकीय ठेकेदारीत आणि त्यातल्या टक्केवारीत हात न बरबटलेल्या, कसल्याही भ्रष्टाचाराच्या आरोपाशी दुरूनही काडीमात्र संबंध नसलेल्या या युवा नेतृत्वाला आज सगळ्या स्तरावरून साथ मिळायला हवी. रोजगारा सारख्या गंभीर प्रश्नाला मी भिडतो म्हणून बेधडक सांगत युवकांच्या पाठीशी राहणाऱ्या या युथ आयकॉनला समाजाने ताकद द्यायला हवी.
समाज ती ताकद देईल सुद्धा! पण त्या अगोदरच विशाल परब यांना कसल्यातरी विषयात अडकवण्यासाठी काही राजकीय धेंडांचे प्रयत्न चालले असल्याची जनतेमध्ये कुजबूज सुरू आहे. काही राजकीय नेत्यांच्या मीडियामधुन विशाल परब यांचा संबंध ड्रग्ज, गांजा याच्याशी असल्याचा अपप्रचार जाणीवपूर्वक केला जात आहे, ज्यामधून त्यांचे व्यावसायिक यश डागाळले जावे यासाठी काहींचे खोटारडे प्रयत्न चालले आहेत. त्यासाठी काही जणांची राजकीय ताकदही वापरली जाईल अशी चिन्हे आहेत. विशाल परब यांनी या गोष्टीची कल्पना आपल्या पक्षाच्या वरिष्ठांना स्पष्टपणे दिली असल्याचेही सूत्रांकडून कळते.
त्यांच्या बदनामीची मोहीम अयशस्वी झाली तर पुढे काही प्रवृत्ती विशाल परब यांच्या जीवावरही उठू शकतील अशी परिस्थिती असल्याचा अहवाल प्रशासनापर्यंत पोहोचल्याचे काही अधिकृत सूत्रांकडून गोपनीयरित्या समजते आणि त्यामुळेच भाजपाच्या या युवा नेतृत्वाला शासकीय संरक्षण देण्याचा पोलीस प्रशासनाचा निर्णय झाला असावा.
प्रश्न केवळ त्यांच्या सुरक्षिततेचा नाही, तर सामाजिक क्षेत्रात काम करत असताना केवळ लोकप्रियतेच्या असूये पोटी विशाल परब यांच्या जीवाला धोका निर्माण होणार असेल, तर सर्वसामान्य जनतेने खऱ्या लोकशाहीने दिलेले अधिकार वापरत राजकीय क्षेत्रात काम करायचे की नाही हा प्रश्न निर्माण होतो? महात्मा गांधीजींच्या स्वप्नातल्या रामराज्यात चांगले काम करणाऱ्या व्यक्तीच्या जीवाला, विशेषतः पारंपारिक राजकारणाला वेगळ्या उंचीवर आणि वेगळ्या दिशेला नेण्यासाठी तन-मन-धन झोकुन काम करणाऱ्या एका सामान्य कुटुंबातून वर आलेल्या महत्त्वाकांक्षी युवा नेतृत्वाच्या जीवावर जर प्रस्थापितांचे राजकारण उठणार असेल, तर हा प्रश्न केवळ विशाल परब यांचा उरत नाही, तो नवे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक युवकाच्या अधिकाराचा होऊन बसतो. शांत सुसंस्कृत सावंतवाडीकर या बदललेल्या राजकारणाने आणि विकासाच्या बुरख्याआडून दिसलेल्या काहींच्या खऱ्या चेहऱ्याने प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. आगामी निवडणूक कालखंडात शांत असलेल्या मोती तलावाचे पाणी आतून आतून गरम होत असल्याचे दिसत आहे. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावू नये. सावंतवाडीकर जनतेतले लोकप्रियतेचे शिखर गाठण्याकडे वाटचाल करणाऱ्या श्री विशाल परब यांच्यासारखे युवा नेतृत्वाच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांनी वेळेवरच उचलली हे अभिनंदनीय आहे. पण ते ज्या परिस्थितीमुळे द्यावे लागत आहे, ती परिस्थिती विचारात घ्यावीच लागेल. कोकणातल्या मोकळ्या वातावरणाला, तळागाळातील सर्वसामान्य जनतेने आपले प्रश्न बेधडक मांडण्याच्या मूलभूत अधिकारांवर हे प्रश्नचिन्ह आहे. राजकारण पुन्हा एकदा इथल्या सर्वसामान्य जनतेचे बनवण्यासाठी, कोकणातील वातावरण निर्भीड आणि मोकळे होण्यासाठी यापुढे जनतेलाच आपली ठाम आणि निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे हे मात्र निश्चित झाले आहे !