विश्रामगृहांच्या गळतीचा कारभार थांबेना!
सार्वजनिक बांधकाम मंत्री अधिकारी आणि ठेकेदारावर काय कारवाई करणार?
आमदार वैभव नाईक यांचा सवाल
कणकवली पाठोपाठ मालवण विश्रामगृहाच्या कामा बाबत प्रश्नचिन्ह
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कणकवली येथील नुतन विश्राम गृहाला गळती लागली असून याचा पोलखोल आमदार वैभव नाईक यांनी केला. दरम्यान मालवण मेढा येथील सा. बा. विभागाच्या सिंधुरत्न (आरसे महाल) विश्रामगृहाची माहिती घेतली असता या विश्राम गृहाला देखील गळती लागल्याचे निदर्शनास आले. ४ कोटी रु खर्च करून या विश्रामगृहाचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र पहिल्या पावसात हे काम निकृष्ट झाल्याचे सिद्ध झाले आहे.त्यामध्ये विश्रामगृहाच्या छप्पराचा काही भाग तुटून पावसाच्या पाण्याची धार लागली आहे. भितींमध्ये पाणी पाझरून त्या ओल्या झाल्या आहेत. स्लॅब मधून पाण्याचे थेंब पडत आहेत त्याठिकाणी बकेट ठेवण्यात आले आहे. फर्नीचरला बुरशी पकडली आहे. यावरून विश्राम गृहाच्या कामात शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याचे स्पष्ट दिसून येते.त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर आणि सा. बा. अधिकाऱ्यांवर सावर्जनिक बांधकाम मंत्री काय कारवाई करणार? असा सवाल आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
मालवण प्रतिनिधी