निकृष्ट कामे करणाऱ्यांवर आमदार कारवाई होणार का?

मनसेचे कुणाल किनळेकर यांचा सवाल

आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आमसभा अधिकारी वर्गाने गांभीर्याने घेतलेली नाही, अशी टीका मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली. आमसभा स्वागतार्ह आहे, परंतु मतदारसंघातील विकास कामे आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी विभागीय आढावा घेण्याची गरज आहे. अधिकाऱ्यांची उदासीनता आणि कार्यकर्त्यांमार्फत होणारी निकृष्ट कामे यावर आमदार निलेश राणे कारवाई करणार का असा सवाल देखील मनसे कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कुणाल किनळेकर म्हटले होते, आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ येथे आमसभा पार पडली. काल झालेल्या आमसभेमध्ये अनेक विभागांचे अधिकारी हे पूर्वकल्पना असून सुद्धा अनुपस्थित राहिले. यामुळे कालची आमसभा खरोखरच यशस्वी म्हणता येईल का शंका आहे. सध्या बीएसएनएलची परिस्थिती म्हणजे लहरी राजा प्रजा आंधळी म्हणजे केंद्र सरकार बीएसएनएलची सुविधा सुधारण्यासाठी काहीच प्रयत्न (निधी स्वरूपात) करत नाही आहेत आणि आपण त्या हतबल अधिकाऱ्यांसोबत भांडत आहोत. त्यामुळे आमसभा घेणे स्वागतार्ह आहे, परंतु पुढे जाऊन या संदर्भात आमदारांनी मतदारसंघातील विकास कामे व शासकीय योजनांची अंमलबजावणी या संदर्भात विभागीय आढावा घेण्याची गरज आहे.
पूर्वकल्पना असून सुद्धा अनेक अधिकारी कालच्या आमसभेला अनुपस्थित राहणे म्हणजे अधिकाऱ्यांची शासकीय कामात उदासीनता दिसत आहे. तसेच कुडाळ व मालवण मध्ये अनेक विकास कामे ही निकृष्ट दर्जाची होत आहेत त्याचप्रमाणे अनेक विकास कामे ही वर्षानुवर्षे रखडून ठेवली गेली आहेत. यामधील अनेक ठेकेदार हे आमदार निलेश राणे यांचेच तसेच त्यांच्या मित्र पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारीच आहेत. यावर लोकप्रतिनिधी आमदार म्हणून जनतेला त्रासमुक्त करण्यासाठी आमदार निलेश राणेंनी कारवाई करण्याची मागणी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी या पत्रकाद्वारे केली आहे.

error: Content is protected !!