आंबा काजू पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँक आपल्या नफ्यातून व कर्ज व्याजदरामध्ये अतिरिक्त २% व्याज सवलतीनुसार रू.२ कोटी पर्यंतची आर्थिक मदत बँक स्वत:च्या उत्पन्नातुन देणार : मनिष दळवी

सन २०२६ पीक हंगामामध्ये जिल्ह्यातील अवकाळी पाऊस दाटधुके आणि खार/दव इ.हवामानीय बदलामुळे नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा,काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँक असून नेहमी शेतकऱ्यांसोबत राहिलेली आहे. बँकेकडून आंबा,काजू या नगदी पिकांसाठी रू. ११० कोटी एवढे शेती कर्ज बँकेमार्फत वितरित केले जाते. शेतकऱ्यांचे हित जाणून जिल्हा बँकेने चालू वर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा,काजू पीक शेतकरी कर्जदारांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने चालू पीक हंगामामध्ये (सन २०२५-२६) ज्या शेतकऱ्यांनी विविध कार्यकारी सहकारी संस्थामार्फत किंवा बँकेकडून थेट स्वरूपात बागायती पीक कर्ज उचल केलेली आहे. अशा शेतकऱ्यांना त्यांचे कर्जाच्या संस्थेकडे अथवा बँकेकडे दि.३० जून २०२६ पर्यंत नियमित कर्ज फेड झाल्यास त्या शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जासाठी लागू असलेल्या नियमित कर्ज व्याज दरामध्ये बँक आपल्या नफ्यातून ८२८० शेतक-यांना अतिरिक्त २% व्याज सवलती नुसार रू.२ कोटी पर्यंतची आर्थिक मदत बँक स्वत:च्या उत्पन्नातुन देणार आहे.असा निर्णय जिल्हा बँकेच्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली. त्याचबरोबर पुढील सन २०२६-२७ हंगामासाठी आंबा पिकाची प्रति हेक्टरी कर्ज मर्यादा रू. ५० हजार तर काजू पिकासाठी प्रति हेक्टरी कर्ज मर्यादा रू. २५ हजाराने वाढवण्यात येणार आहे. त्यानुसार चालू वर्षी रू.२,७५,०००/- आंबा पिकासाठी कर्ज उपलब्ध होणार असुन या वाढीव मर्यादेमुळे सुमारे ३० कोटी तर काजू पिकासाठी रू. २,००,०००/- प्रमाणे कर्ज उपलब्ध होणार असुन १० कोटी असे मिळुन एकुण रू.४० कोटी जादा कर्ज पुरवठ्याची तरतुद केली जाणार आहे. आंबा पिक जिल्ह्यात करार पध्दतीवर केले जाते स्वत:च्या लागत्या कलमाबरोबर तेवढ्याच करार पध्दतीच्या कलमासाठी बँकेकडून चालू वर्षापासुन कर्ज पुरवठा करण्यात येईल. त्यासाठी रू.२० कोटी रक्कमेची तरतुद करण्यात आली आहे. वरील पीक कर्जासाठी शेतक-यांनी रु.३.००लाख कर्ज मर्यादेपर्यंत कर्ज नियमित व मुदतीत परतफेड केल्यास त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी ३ % प्रमाणे एकुण ६% व्याजाचा लाभ होऊन शेतकऱ्यांना सदर कर्ज ०% व्याजदराने उपलब्ध होणार आहे.तरी जिल्हा बँकेने आंबा, काजू पीक कर्जावरील या आंबा, काजू पीक कर्जासाठी २% व्याज सवलत लागू केलेली असुन या संधीचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले आहे.





