जलजीवन मिशन ही केंद्र शासनाची योजना, इथे भूमिपूजन करण्याचा तुमचा संबंध काय ?

भाजप तालुकाध्यक्ष दादा साईल यांचे टीकास्त्र
कुडाळ तालुक्याच्या गावागावातून आमदार वैभव नाईक यांना खडेबोल
कुडाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१९ मध्ये जलजीवन मिशन या महत्त्वाकांक्षी योजनेद्वारे प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची घोषणा केली. आज देशाच्या कानाकोपऱ्यात या योजनेची यशस्वी अंमलबजावणी सुरू असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला या योजनेसाठी ६०० कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर झाला आहे. तसेच अनेक गावात प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे.
याच जलजीवन मिशन योजनेचे श्रेय घेण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे उपटसुंभ आमदार वैभव नाईक हे गावागावात भूमिपूजनाचा घाट घालत लोकांमध्ये या योजनेबाबत संभ्रम निर्माण करत आहेत. मुळात ही योजना राबविताना त्याच्या कुठल्याही प्रक्रियेत या आमदाराचा संबंध नाही. केंद्राची योजना त्यात ५० टक्के अनुदान राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून आणि योजनेची अंदाजपत्रके आणि प्रत्यक्ष नियंत्रण जिल्हा परिषदकडून, यात कुडाळ-मालवणचे आमदार हे कुठेच बसत नाहीत. मात्र, इतर काहीच कामधंदे स्वतःचे कार्यकर्ते आणि जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी वैभव नाईक हे भूमिपूजनाचे धंदे करत आहेत, असे टीकास्त्र कुडाळ भाजप तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी सोडले आहे.
आज पावशी गावात अशाच जलजीवन मिशन योजनेचे भूमिपूजन करण्यासाठी आलेल्या वैभव नाईक यांना स्थानिक नागरिकांनी या योजनेबद्दल विचारणा केली असता ततपप करत पळून जाण्याची वेळ वैभव नाईक यांच्यावर आली. यापूर्वीही साळगावमधून आमदार वैभव नाईक यांच्यावर असेच भूमिपूजन न करता माघारी फिरायची वेळ आली होती. मात्र, त्यातूनही बोध न घेता वैभव नाईक यांनी पावशी गावात जाऊन माती खाल्ली, अशी टीका दादा साईल यांनी केली आहे.
जलजीवन मिशन योजना ही केंद्राची असून ज्याला पक्ष नाही, चिन्ह नाही, अक्कल नाही अशा वैभव नाईकांना भूमिपूजन करायचा हक्क नाही ही आता कुडाळ-मालवणमधील सर्वसामान्य जनतेची भावना आहे. ज्या वैभव नाईकांना आमदारकीच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात मतदारसंघातील रस्ते सुधारता आले नाहीत तो कोट्यवधींची विकासकामे आपण मंजूर केल्याचे सांगत असेल तर ते लोकांकडून असेच बेइज्जत होत राहतील यात शंका नाही, अशीही टीका दादा साईल यांनी केली आहे.
प्रतिनिधी, कुडाळ