झारखंडमधील मानसिक आजारी महिलेचे जवळपास एक वर्षानंतर कुटुंबाशी पुनर्मिलन.

झारखंड येथील हरवलेली मानसिक आजारी महिला ललिता उर्फ मनदेवी बिरेंद्र मेहता हिचे जवळपास एक वर्षानंतर तिच्या कुटुंबाशी यशस्वी पुनर्मिलन करण्यात आले. हे पुनर्मिलन गुगल सर्च आणि सामाजिक संस्थांच्या समन्वित प्रयत्नांमुळे शक्य झाले.

ही महिला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील शिवापूर परिसरात एकटी फिरताना आढळून आली होती. स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, तिच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी तिला ३० ऑगस्ट २०२५ रोजी संविता आश्रमात दाखल करण्यात आले.

योग्य उपचार आणि सहकार्यामुळे तिची प्रकृती हळूहळू सुधारली आणि तिने आपल्या गाव व कुटुंबाबाबत माहिती देण्यास सुरुवात केली.

तिने दिलेल्या माहितीच्या आधारे जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरें यांनी गुगलच्या मदतीने झारखंड राज्यातील कोडरमा जिल्ह्यातील डोमचांच तालुक्यातील नवाडीह हे तिचे मूळ गाव शोधून काढले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिचे पती बिरेंद्र मेहता यांच्याशी संपर्क साधण्यात आला.

आर्थिक अडचणींमुळे तिच्या कुटुंबाला महाराष्ट्रात येणे शक्य नव्हते. मात्र, व्हिडिओ कॉलद्वारे सातत्याने संपर्क ठेवण्यात आला.

अलीकडेच श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशनच्या मदतीने या महिलेला सुरक्षितपणे झारखंडमधील तिच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले.

ही घटना मानवतेच्या कार्याचे एक उत्कृष्ट उदाहरण ठरते.
जीवन आनंद संस्थेला गिव्हइंडिया या संस्थेचा मोलाचा पाठिंबा मिळत आहे. गिव्ह इंडियाचा २८ एप्रिल हा स्थापना दिन ‘गिव्ह.डू’ म्हणून साजरा केला जातो.

जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांनी गुगल, गिव्ह इंडिया संस्था आणि या कार्यात मदत करणाऱ्या सर्व व्यक्तींचे आभार मानले.

error: Content is protected !!