सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान; पंचनाम्याची वाट न बघता सरसकट नुकसान भरपाई जाहीर करा

माजी आमदार वैभव नाईक यांची महायुती सरकारकडे मागणी
पोईप येथे शेतकऱ्यांच्या मळ्यात जाऊन भात आणि भुईमूग पिकाच्या नुकसानीची वैभव नाईक यांनी केली पाहणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास साडेपाच महिने पाऊस सुरु असून सरकारने उशिरा का होईना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.परंतु मागील नुकसान भरपाई सरकारने दिलेली नाही. यावर्षी पीक विमा देखील सरकारने बंद केल्याने या नुकसानीत विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले असते ते देखील मिळणार नाहीत. मात्र सातत्याच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीला शेतकरी मेटाकुटीस आला आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भात, भुईमूग व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले असून पंचनाम्याची वाट न बघता सरकारने सरसकट नुकसान भरपाई जाहीर केली पाहिजे अशी मागणी कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी महायुती सरकारकडे केली आहे.
माजी आमदार वैभव नाईक यांनी काल शुक्रवारी पोईप गावातील पालववाडी, भटवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतीच्या मळ्यात जाऊन भात पीक आणि भुईमूग पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी मिलिंद कदम, उपकृषी अधिकारी श्रीपाद चव्हाण हे उपस्थित होते. त्यांच्याकडून नुकसानीचा आढावा घेण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पोईप विभागप्रमुख विजय पालव,युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, शिवसेना शाखाप्रमुख बाळा सांडव, जयवंत परब, विलास सांडव, बबलू वेंगुर्लेकर, नितीन पालव, मालोजी रासम, गिरीश पालव, स्वप्नील पालव,बाबू पालव आदी उपस्थित होते.





