महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नी वैभव नाईकांवर गुन्हे करून खड्डे बुजणार का!

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा सवाल
गेली अनेक वर्ष एकाच जागेवर ठाण मांडून असलेल्या कनिष्ठ अभियंता साळुंखे यांची बदली करा
मुंबई गोवा महामार्गाची पुरती दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून दुरावस्था थांबणार आहे का. आणि त्यातून महामार्गावर होणारी जीवितहानी टाळणार का असा सवाल करत असे हजार गुन्हे दाखल केले तरी शिवसैनिक घाबरणार नाही. गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे ठाण मांडून बसलेले कनिष्ठ अभियंताचे साळुंखे यांची तातडीने बदली करण्याची मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री उपरकर यांनी म्हटले आहे की आज पर्यंत आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने रास्ता रोको केले, निवेदने दिली चर्चा केली. मात्र महामार्गाच्या वस्तुस्थितीत कोणताही फरक पडलेला नाही. त्यामुळे शिवसेनेने केलेल्या आंदोलन व त्यातून झालेल्या उद्रेकाबाबत माजी आमदार वैभव नाईक यांच्यावरच नव्हे शिवसैनिकांवर हजार गुन्हे दाखल केले तरीही आम्ही घाबरणार नाही. उप अभियंता श्री. शेडेकर यांच्यानंतर आलेल्या श्री साळुंखे यांनी आपल्या कार्यकाळात महामार्गाच्या वस्तुस्थितीवर कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. अथवा नियंत्रणही ठेवले नाही. महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे आहेत. मिडल कट व या खड्ड्यांमुळे अनेकांचे जीव गेले. मात्र त्याबाबत कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. उलट ठेकेदार व महामार्गाच्या आरओ लाईन मध्ये येणाऱ्या काम करून मलिदा घेण्याचे काम त्यांनी केले आहे असा आरोपही उपरकर यांनी केला आहे.
श्री साळुंखे येथे गेली पाच सहा वर्ष याच ठिकाणी आहेत. वास्तविक अशा अधिकाऱ्यांची तीन वर्षानंतर बदली होते मात्र हे येते ठाण मांडून का आहेत? त्यांची तातडीने बदली करा अशी मागणी ही श्री. उपरकर यांनी केली आहे.





