“संगीत श्रावणाचे” हा गझलसंग्रह आणि “अक्षरांची कविता”हा बालकवितिसंग्रह प्रकाशित

मुंबई : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दादर, वांद्रे आणि पार्ले शाखेच्यावतीने सूर्यकांत मालुसरे यांच्या ‘ अक्षरांची कविता ‘ या बालकवितासंग्रहाचे आणि “ग्रंथाली”च्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या कमलाकर राऊत यांच्या ‘ संगीत श्रावणाचे ‘या गझलसंग्रहाचे प्रकाशन रविवार दिनांक १२ फेब्रुवारी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, माटुंगा पश्चिम येथे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विश्वस्त ‘रेखा नार्वेकर’, पुरस्कार समिती प्रमुख प्रा.अशोक ठाकूर, भाषा संचालक श्रीमती विजया डोनीकर , साहित्यिक प्रा.प्रतिभा सराफ,माजी दूरदर्शन निर्माता दीपक शेडगे, लेखक व समीक्षक शिवाजी गावडे, मराठी विकास संस्थेचे प्रकल्पप्रमुख विलास शिरसाट आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विभागीय सहायक संचालक योगेश शेडट्ये, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर , माजी पोलीस सहआयुक्त व कवी रविकिरण पराडकर,चित्रकार व कवी प्रकाश पाटील तसेच अनेक मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.या सर्वच मान्यवरांनी दोन्ही पुस्तकांवर आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले. स्वाती गावडे यांनी कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनी पाठविलेल्या शुभेच्छा वाचून दाखविल्या ,मनोज वराडे यांनी बालकवी एकनाथ आव्हाड यांनी लिहिलेल्या शुभेच्छांचे वाचन केले.
यिप्रसंगी बोलताना रेखा नार्वेकर म्हणाल्या की, ” लेखकाने आपले हात लिहिते ठेवले पाहिजेत.कारण साहित्य हा काळाचा आरसा असतो ;ज्यात वास्तवाचं दर्शन घडत असतं .अशा साहित्यिक कार्यक्रमांद्वारे साहित्याचे अभिसरण होत असते. मराठी वृत्तबद्ध गझल म्हणजे कवितेचं क्रिस्टलायझेशन म्हणजेच संपृक्तकरण असते. गझल केवळ वृत्त नव्हे ;तर त्या गझलकाराची वृत्ती होय. गझलेत त्या गझलकाराचे विचार, भावना, संवेदनशीलता आदी सामावलेले असतात.ही वृत्ती कमलाकर राऊत यांनी जोपासली आहे. तसेच सूर्यकांत मालुसरे यांनी बालकांसाठी सुबोध बालकविता लिहिल्या आहेत. अशा सोप्या आणि संस्कारी कविता लिहिल्या गेल्या पाहिजेत.
” प्रा.प्रतिभा सराफ यांनी ” कमलाकर राऊत यांच्या गजलांना अंगभूत चाल आणि लय असल्याने त्यांची चांगली गाणी होऊ शकतात.अशाच परिणामकारक कविता आणि लिखाण लेखकांकडून व्हायला हवे.” असे म्हटले.
दीपक शेडगे यांनी सूर्यकांत मालुसरे यांच्या बालकवितांवर बोलताना ” बालकविता लिहिणे फार कठीण असते ;कारण त्यासाठी सोपे शब्द वापरावे लागतात आणि त्या बालकांना समजणाऱ्या तसेच त्यांच्यावर चांगले संस्कार करणाऱ्या असाव्या.आणि कमलाकर राऊत यांची गझल ही मर्मभेदी परंतु सहजसुंदर अशी गझल असल्याचे प्रतिपादन केले.
भाषा संचालक विजया डोनीकर यांनी ‘मालुसरे यांची अक्षरांची बालसुलभ कविता
ज्येष्ठांनाही भावणारी आहे आणि राऊत यांची गझल ही समाजभाव जोपासणारी आहे ‘ असे म्हटले. विभागीय सहायक संचालक योगेश शेट्ये यांनी सूर्यकांत मालुसरे आणि कमलाकर राऊत यांच्या सहवासातील काही जुन्या आठवणींना उजाळा देऊन दोन्ही कवींना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुखपृष्ठकार प्रकाश पाटील,शिवाजी गावडे आणि नरेश ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.
या अनुषंगाने ज्येष्ठ कवी रविकिरण पराडकर यांच्या अध्यक्षतेत कविसंमेलन आयोजित करण्यित आले होते त्यात ३२ कवींनी आपल्या विविधधांगी कविता सादर केल्या,या कवितांना रसिकांनी चांगली दाद दिली. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन पुष्पा कोल्हे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुमंजिरी गाटणे यांनी केले .तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौभाग्यश्री खाडये आणि संतोष खाडये यांनी केल
ब्युरो न्यूज/ / कोकण नाऊ / मुंबई