बॅ. नाथ पै मित्रमंडळाच्या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राजकीय टोलेबाजी

सुशांत नाईक यांना केली तशी नगराध्यक्ष होण्यासाठी नलावडे यांना देखील मंडळाने मदत केली
कणकवली शहरातील सत्ताधारी, विरोधक एकाच व्यासपीठावर
बॅ. नाथ पै यांचे विचार पुढे नेण्याचे काम बॅ. नाथ पै मित्रमंडळ करीत आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. मंडळाच्या कोणत्याही उपक्रमास आपला खारीचा वाटा असेल अशी ग्वाही ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी दिली.
बॅ. नाथ पै मित्रमंडळातर्फे उपजिल्हा रुग्णालयात समोरील मैदानावर नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे उदघाटन दादा कुडतरकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी श्री. कुडतरकर बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक सुशांत नाईक, राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबीद नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर, मेघा गांगण, मानसी मुंज, भाजपचे शहराध्यक्ष अण्णा कोदे, व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष तथा उद्योजक दीपक बेलवलकर, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे, पत्रकार तुषार सावंत, मंडळाचे अध्यक्ष अमोल रासम, उपाध्यक्ष नीलेश राणे, खजिनदार अमित मयेकर, सचिव अनिल परब, सहसचिव सुभाष राणे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार मंडळातर्फे शाल,श्रीफळ सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.तसेच तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष पदी पत्रकार अनिकेत उचले यांची निवड झाल्याबद्दल मंडळाकडून सत्कार करण्यात आला.
गणेश उर्फ बंडू हर्णे म्हणाले, बॅ. नाथ पै विचार जोपण्याचे काम बॅ. नाथ पै मित्रमंडळ करीत आहेत. कणकवलीतील खेळाडूंना खेळांचा सराव करता यावा यासाठी न.पं.ने क्रीडा संकुल उभारले आहे. शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी येत आहे. बॅ. नाथ पै मित्रमंडळ हे शिस्तबद्ध मित्रमंडळ असून न.पं.च्या माध्यमातून बॅटमिंटन व कबड्डीचे मैदान स्पोटर्स संकुलात उपलब्ध करून दिले आहे. न. पं. च्या माध्यमातून क्रीडांगणासाठी पहिल्या टप्प्यातील ४ कोटी रुपये निधी आम. नीतेश राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. पुढील वर्षी हक्काचं मैदान उपलब्ध होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. नगरसेवक होण्यासाठी सुशांत नाईक यांच्या पाठिशी हे मंडळ राहिले असेल. मात्र, नगराध्यक्ष समीर नलावडे होण्यासाठी देखील या मंडळाचे मोठे योगदान असल्याचे सांगत कोपरखळी श्री. हर्णे यांनी लगावली.
संदेश पारकर म्हणाले, बॅ. नाथ पै हे उत्कृष्ट संसदपटू होते. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन हे बॅ. नाथ पै मंडळ सुरू केले. जेव्हा नाथ पै संसदेत भाषण करायचे, तेव्हा तेव्हाचे पंतप्रधान सभागृहात उपस्थित राहायचे. येथील जनता देखील त्यांच्या पाठींशी खंबीरपणे उभे रहायची. जो पॅर्टन कणकवलीत राबविला जातो, त्याचे अनुकरण जिल्हा करतो. कणकवली शहर जिल्ह्याचे मध्यवर्ती व महत्वाचे शहर आहे. बॅ. नाथ पै मित्रमंडळाचे सर्वच उपक्रम कौतुकास्पद असतात. हे मंडळ जे जे कार्यक्रम हाती घेईल त्यावेळी आम्ही सर्वच जण आपल्या पाठींशी राहु, अशी ग्वाही त्यांनी देतानाचा तुमच्यातून अडीअचडणींना धावून येणारे नेतृत्व उभे राहत आहे. लोकांच्या सेवेत राहिल्यानंतर जनता आपल्याला स्वीकारते, यासाठी धडपड करत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काम करत रहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले.
सुशांत नाईक म्हणाले, १० वर्षांपूर्वी बॅ. नाथ पै मित्रमंडळाने सपोर्ट केला नसता तर मी नगरसेवक झालो नसतो. मी पहिल्यांदा नगरसेवक होण्यामध्ये या मंडळाचे योगदान मोठे आहे. या मंडळाच्या सदस्यांमुळे आणि येथील जनतेच्या आशीर्वादा मुळे मी नगरसेवक होऊ शकलो अशी कबुली त्यांनी दिली.तसेच याच मंडळातून अनेक ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा मी खेळलो. आताच्या धावपळीच्या युगात मंडळाच्या काही कार्यक्रमांमध्ये खंड पडला असला तरी यापूर्वी विविध स्पर्धा हे मंडळ राबवित होते. त्याचा मी हिस्सेदार होतो. आज पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हे मंडळ सामाजिक कार्यक्रमांसाठी सक्रिय झाले असल्याचा अभिमान मला आहे असे त्यांनी सांगितले.
अबीद नाईक म्हणाले, काही वर्षांपूर्वी या मंडळाची क्रिकेट स्पर्धा किंवा इतर उपक्रम हे खंडित झाले होते. अशा स्पर्धा व सामजिक उपक्रम पुन्हा सुरू करण्यासाठी गेल्या आठवड्यात ही मंडळी माझ्या घरी आली. कार्यक्रमाला उपस्थित राहणे हे महत्वाचे नसून मंडळाच्या मनात पुन्हा अबीद नाईक यांचे नाव राहणे महत्वाचे आहे. शहरात माझे समाजभिमुख काम सुरू असते, याच माध्यमातून युवा वर्ग एकत्र येऊन समाजात एकोपा निर्माण होतो. यापेक्षाही सर्वोत्तम कार्यक्रम घ्यावेत, मी तुमच्या सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
मंडळाचे अध्यक्ष अमोल रासम म्हणाले, समाजसेवक मामा आळवे हे विचारांचे खरे मुळ आहे. त्यांच्या विचारांवरच हे मंडळ पुढे नेत आहोत. ज्येष्ठ नागरिक हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले ही बाब आमच्या साठी अभिमानास्पद आहे. आपण मान्यवरांनी जी साथ दिली. ती महत्वाची आहे, यापुढील काळात हे मंडळ विविध कार्यक्रम राबवणार आहे. हे मंडळ बॅ नाथ पै यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन राजेश कदम व विलास गोलतकर यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रशांत कुडतरकर, योगेश मुंज, मिथिलेश जोगळे, प्रांजल चव्हाण, मंगेश राणे, समीर पावसकर, अमित राणे, संदेश मयेकर, गौरव मुंज, चेतन वालावलकर, ओमकार चव्हाण, सिद्धेश सावंत, स्वप्नील तांबे, विल्सन पिंटो, वैभव सावंत हे मेहनत घेत आहेत. या स्पर्धेत ७ संघांनी सहभाग घेतला असून प्रत्येक संघात आयकाॅन खेळाडू असेल. ही स्पर्धा तीन दिवस चालणार असून अंतिम सामना रविवारी होणार आहे. या स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींमी उपस्थित राहावे, असे आवहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
दिगंबर वालावलकर / कणकवली